माधव भांडारी : “पाण्याचा प्रश्न आणि पुनर्वसन’ या विषयावर कार्यक्रम
पुणे – स्वातंत्र्यानंतर पुरेसे नियोजन न करता विकासकामे हाती घेतल्यामुळे पुनर्वसनाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. इतकेच नव्हे तर राज्यात “प्रकल्पग्रस्त’ ही नवी जात तयार झाली असून तिची अवस्था अत्यंत वाईट आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केले.
एकता मासिक फाऊंडेशन आणि विश्व संवाद केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भांडारी बोलत होते. “पाण्याचा प्रश्न आणि पुनर्वसन’ या विषयावर भांडारी यांनी मत मांडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी, रवींद्र घाटपांडे, डॉ. शरद कुंटे आणि विद्याधर ताठे, जनता सहकारी पक्षाचे अध्यक्ष संजय लेले, स्व. रामदासजी कळसकर स्मृती विश्वस्त संस्थेचे शरद भिडे, डॉ. सुनील भंडगे, न. म. जोशी, सांगलीचे बापूसाहेब पुजारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जेथे पाणी असते तेथे वस्ती होते. मात्र, महाराष्ट्राची भौगौलिक स्थिती अशी आहे, की संपूर्ण राज्य सिंचनाखाली आणणे अशक्य झाले आहे. राज्यातील केवळ 18 टक्के भूभाग सिंचनाखाली आणता येऊ शकतो असे स. गो. बर्वे यांनी म्हटले आहे, तर माधवराव चितळे यांनी 30 टक्के महाराष्ट्र सिंचनाखाली आणू शकतो, असा अहवाल दिला आहे. आजही राज्यातील 40 टक्के भाग दुष्काळी आहे, असे ते म्हणाले. मिलिंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. घाटपांडे यांनी आभार मानले.
प्रकल्पग्रस्त एक जातच बनली!
या सगळ्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात “प्रकल्पग्रस्त’ ही एक जातच बनली आहे. ती त्यांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट झाली आहे. राज्यात 50 लाखांपेक्षा जास्त कुटुंबे विस्थापित म्हणून जगत आहेत. एकट्या सातारा जिल्ह्यात कोयना प्रकल्पग्रस्त सोडून विस्थापित कुटुंबांची संख्या 60, 000 आहे, अशी माहिती माधव भांडारी यांनी दिली.