अहमदाबाद – देशातील वाढत्या बेरोजगारीच्या संकटाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत दखल घेतली आहे.त्यासाठी त्यांनी “भारत-केंद्रित” मॉडेल्स उभारण्याची शिफारस केली आहे.
अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी आणि शाश्वत तसेच सर्वांगीण विकास साधण्यासाठी भारत केंद्रीत देशी मॉडेल्स उभारणे गरजेचे आहे असे संघाने त्या बैठकीतील एका ठरावात नमूद केले आहे. देशाला सर्वच क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी ही मॉडेल्स उपयोगी ठरावीत असेही यात नमूद करऱ्यात आले आहे.
बेरोजगारीच्या या संकटावर मात करण्यासाठी समाजानेही सक्रिय भूमिका बजावली पाहिजे अशी अपेक्षाही संघाने व्यक्त केली आहे. कोविडच्या साथीमुळे एकूणच आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातून रोजगार निर्मीतीवरही विपरीत परिणाम झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण समाजाने रोजगाराच्या एकूण आव्हानांना तोंड देण्यासाठी कामाच्या संधींचा उपयोग करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे अशी अपेक्षा संघाने व्यक्त केली आहे.
प्रस्तावित भारतीय आर्थिक मॉडेल मध्ये मानव-केंद्रित, श्रमकेंद्रित, पर्यावरणास अनुकूल बाबींवर भर देण्यात यावा आणि विकेंद्रीकरण तसेच लाभांचे समान वितरण यावर जोर देण्यात यावा असे त्यांनी सुचवले आहे. अहमदाबादच्या पिराना येथे संघाच्या प्रतिनिधी सभेच्या तीन दिवसांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी या बैठकीचा समारोप झाला. तेथे अखेरच्या दिवशी संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार, ग्रामीण रोजगारक्षमता, असंघटित क्षेत्रातील रोजगार, महिलांना रोजगार आणि अर्थव्यवस्थेतील त्यांचा एकूण सहभाग यासारख्या क्षेत्रांना चालना देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सामाजिक परिस्थितीनुसार नवीन तंत्रज्ञान आणि सॉफ्ट स्किल्सशी जुळवून घेण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक आहेत, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
या ठरावात असेही म्हटले आहे की, लोकांना, विशेषत: तरुणांना शिक्षित आणि समुपदेशन करून उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे वातावरण तयार केले जावे, जेणेकरून ते केवळ नोकरी शोधण्याच्या मानसिकतेतून ते बाहेर पडू शकतील.महिला, गावातील लोक आणि दुर्गम आणि आदिवासी भागातील लोकांमध्येही अशीच उद्योजकता वाढवणे आवश्यक आहे, असेही त्यात म्हटले आहे.