Satara | महायुतीच्या मोर्चेबांधणीत जिल्ह्यात उदयनराजेंची भूमिका महत्त्वाची

सातारा, {संदीप राक्षे} – खा. उदयनराजे भोसले यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवून भाजपचे साताऱ्याचे पहिले खासदार म्हणून वेगळ्या विक्रमाची नोंद केली.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा सातारा जिल्ह्यात रोवण्यासाठी खा. उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रणनीती आखली आहे.
या रणनीतीनुसार सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव आणि सातारा व वाई या पाच विधानसभा मतदार संघात महायुतीसाठी उदयनराजे लवकरच सक्रिय होणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार उदयनराजे भोसले यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुंबईत पार पाडली. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांचा विशेष आढावा घेण्यात आला.
या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. पंकजाताई मुंडे, माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष विक्रम पावसकर इत्यादी सदस्य यावेळी उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत संघर्ष पूर्ण विजय मिळवून भाजपचा खुट्टा सातारा जिल्ह्यात बळकट केला आहे. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याच यशाची पुनरावृत्ती करायची आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये पाटण व कोरेगाव हे विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे असून वाई मतदार संघ हा राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्याकडे आहे.
येथून आ. मकरंद पाटील प्रतिनिधित्व करतात कराड उत्तर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. बाळासाहेब पाटील आहेत. याशिवाय कराड दक्षिण मध्ये काँग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण प्रतिनिधित्व करत आहेत.
कराड उत्तर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मनोज घोरपडे, धैर्यशील पाटील, रामकृष्ण वेताळ तसेच कराड दक्षिणमध्ये भाजपचे अतुल बाबा भोसले यांनी प्रचंड जोर लावत आणि कमालीची एकी दाखवत खा. उदयनराजे यांना जास्तीत जास्त आघाडी देण्याचा प्रयत्न केला होता.
कराड उत्तरमध्ये ही एकी प्रचंड प्रमाणात दिसून आली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रामाणिक काम करत सातारा मतदारसंघावरचा आपला एक हाती करिष्मा दाखवून दिला होता.
त्यामुळे शेवटच्या दहा मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये खा. उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवत विजयाची नोंद केली. यामुळे भाजपचा उत्साह वाढला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय समन्वय उत्तम आहे.
महायुतीच्या प्रचाराची आणि रणधुमाळीची कमान ही खा. उदयनराजे भोसले यांच्याच खांद्यावर रालhळहील अशा वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली आहेत.
शिंदे गटासाठी सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे ही जोड गोळी उदयनराजे यांच्याबरोबर समन्वयाने सक्रिय राहणार आहे.
तसेच राष्ट्रवादीचे अजित दादा पवार गटाचे आ. मकरंद पाटील यांचा वाई मतदारसंघात एक हाती करिष्मा असला तरी महाविकास आघाडीने येथे जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.
लोकसभा निवडणुकांच्यावेळी उदयनराजेसाठी आमदार मकरंद पाटील यांनी अखेरच्या टप्प्यात आपला राजकीय मुत्सद्दीपणा दाखवला होता.
आता विधानसभा निवडणुकांमध्ये सातारा, वाई, कोरेगाव, कराड उत्तर आणि दक्षिण या पाच मतदारसंघांमध्ये भाजपचे बारकाईने लक्ष राहणार असून बरीचशी सूत्रे ही जलमंदिर येथून हलण्याची शक्यता आहे.
सर्व आमदारांबरोबर समन्वयाने काम करून उदयनराजे जास्तीत जास्त आमदार सातारा जिल्ह्यातून निवडून येतील यासाठी सक्रिय राहणार आहेत.
या बैठकीमध्ये उदयनराजे भोसले यांनी या सर्व मतदारसंघाची अत्यंत बारकाईने मांडणी केली आणि सर्व कार्यकर्त्यांनी विशेषता बूथ प्रमुख, मंडल प्रमुख तसेच वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रमुख यांनी जास्तीत जास्तीत जास्त मतदान होऊन सर्वांनी एकत्रित काम केल्यास विजय निश्चित आहे अशी ठाम भूमिका उदयनराजे यांनी बैठकीत मांडली.
लोकसभा निवडणुकीमध्ये कराड उत्तर आणि दक्षिण या दोन मतदारसंघांवर उदयनराजे यांनी विशेष भर दिला होता. तोच फॉर्मुला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वापरला जाणार आहे. कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे यांनी राजकीय रणधुमाळीमत चांगलीच रंगात आणली आहे.
त्यांच्या मनोज पर्व या कार्यक्रमाला कराड उत्तरमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते गेले.
दोन टर्म राजकीय मतभेदांमुळे भाजपला या मतदारसंघात फटका बसल्यामुळे राष्ट्रवादीचे फावले होते आणि आ. बाळासाहेब पाटील यांचा विजय सोपा झाला होता.
यंदा तसे न होता मनोज घोरपडे यांनी प्रचंड जोर लावल्याने महायुतीला सुद्धा त्यांच्या मागणीचा विचार करावा लागणार आहे.
कराड उत्तर, दक्षिण, सातारा, वाई, कोरेगाव या पाच विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी प्रचार यंत्रणा राबवणे अशा विविध जबाबदाऱ्या उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जातील असा मुंबईतील बैठकीचा सूर आहे.
सातारा जिल्ह्यात भाजपच्या प्रचाराची कमान उदयनराजे सांभाळतील असे चित्र आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांना महाराष्ट्राचे कॅप्टन घोषित केले होते.
उदयनराजेंच्या होमग्राउंड असणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीच्या सातारा जिल्ह्यातील बांधणीसाठी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असे चित्र आहे.




