चांभार घाटाकडे जाणारा रस्ता अतिक्रमण मुक्त करून सुशोभिकरण करावे; राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नगरपरिषदेकडे मागणी

आळंदी – येथील चांभार घाटाकडे जाणारा रस्ता अतिक्रमण मुक्त करून घाट स्वच्छता सुशोभीकरण करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने तुषार नेटके यांनी आळंदी नगरपरिषदेस दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, तिर्थक्षेत्र आळंदी येथील चांभार घाट हा अनेक वर्षापासुन दुर्लक्षित आहे. परिसरात दुर्गंधीयुक्त, मैलायुक्त सांडपाणी, ड्रेनेज पाईप लाईनद्वारे इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीचे पात्र दुषित होत आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने रोगराई पसरत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी.
अलिकडील काळात चांभार घाटावरून स्काय वॉक पुलाचे काम पूर्ण झाल्याने सर्व भाविकांचा त्यावरून येजा करण्यासाठी वापर होत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा तेथे खाली असणाऱ्या घाटाकडे जात आहेत. स्काय वॉक पुल हा दर्शनबारीसाठी बनविला आहे. त्या पुलावर नागरिक फेरफटका मारण्यासाठी दररोज येत असतात त्यामुळे तो मुख्य आकर्षण बनला आहे.
तसेच या निवेदनात पालिकेवर टिका करताना त्यात नमूद केले आहे की, वारंवार नगपरिषद कार्यालयात निवेदन, पत्र / अर्ज देऊन कोणतीही दखल अथवा लेखी उत्तर आले नाही. त्यामुळे दिलेल्या पत्रांचा अवमान होत असल्याचे दिसुन येते. त्यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावत असल्याने दिलेल्या अर्जाचा आदरपूर्वक विचार करून चांभार घाटाचे सुशोभिकरण कामास सुरूवात करावी, ही अपेक्षा आहे. अन्यथा चर्मकार समाज बांधवांच्या वतीने चांभार घाटावरती लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
चांभारघाट दुरूस्तीसाठी सुचना –
-घाटास श्रीसंत रोहिदास महाराज हे नाव देण्यात यावे.
-सदर ठिकाणावरून इंद्रायणीपात्रात सोडण्यात येणारे दुर्गंधीयुक्त, मैलायुक्त ड्रेनेज लाईनचे सांडपाणी कायमस्वरूपी बंद करावे. त्यामुळे इंद्रायणी प्रदुषित होत आहे.
-घाटाच्या सर्व परिसराची स्वच्छता करणे.
-तुळशी वृंदावन, शिवसृष्टी यांसारखे शिल्प चांभार घाटावर उभारावे त्यामुळे (Alandi) आळंदीच्या सुशोभिकरणात वाढ होईल.
-चांभार घाटाकडे जाणारा मुख्य रस्ता खुला करावा.
-घाटावरती लाईट व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
-घाटाचे पावित्र्य राखले जावे.



