Shashi Tharoor: ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा हे धोरण संपूर्ण जगाला आंधळे करेल’, इस्रायल-हमास संघर्षावर शशी थरूर म्हणाले…

Shashi Tharoor: इस्रायल-हमास संघर्षाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, हिंसाचाराचा अवलंब करून मतभेद सोडवायचे बंद केले पाहिजे. कारण डोळ्याच्या बदल्यात डोळा हे धोरण अवघ्या जगाला आंधळे बनवेल. संयुक्त राष्ट्र महासचिवांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचे इस्रायलचे पाऊल अयोग्य असल्याचेही शशी थरूर यांनी म्हटले आहे.
शशी थरूर म्हणाले की, ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बाब आहे. एक वर्षापूर्वी 7 ऑक्टोबरला जे घडले ते अतिशय दुःखद होते. 1200 लोक मारले गेले. यामध्ये प्रामुख्याने निष्पाप नागरिक होते. तसेच 200 लोकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर आलेली प्रतिक्रिया अनेक प्रकारे वाईट होती. सुरुवातीला इस्रायल स्वसंरक्षणाचा अधिकार वापरत होता. पण नंतर तो इतका वाढला की 41 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला.
ते म्हणाले की, या हल्ल्यांमुळे गाझामधील बहुतेक लोकसंख्या विस्थापित झाली आणि संपूर्ण प्रदेशात आपत्तीजनक विनाश झाला. मोठ्या प्रमाणात शाळा, रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्रे, मशिदी उद्ध्वस्त झाल्या. आता युद्ध उत्तरेकडे लेबनॉनच्या दिशेने विस्तारत आहे. इथेही अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नासधूस झाली आहे. हा खरोखरच एक दुःखद संघर्ष आहे. मला असे वाटते की गेल्या वर्षी या दिवशी आपल्यापैकी कोणालाही युद्ध वर्षभर चालू राहण्याची अपेक्षा नव्हती. लवकरात लवकर युद्धबंदीचे आवाहन करण्यात आम्ही सरकारसोबत सहभागी होऊ शकतो. महात्मा गांधींची तत्त्वे अंगीकारली पाहिजेत.
यूएनचे सरचिटणीस यांच्या इस्रायलमध्ये प्रवेश करण्यावर घातलेल्या बंदीबाबत शशी थरूर म्हणाले की, विचित्र गोष्ट अशी आहे की जर तुम्ही एखाद्या क्लबचे सदस्य असाल तर तुम्ही क्लबचे प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तेथे न येण्यास सांगाल का? ही थोडी विचित्र भूमिका आहे. मी याला अतिरेकी भूमिका म्हणेन. सरचिटणीस कोणत्याही परिस्थितीत इस्रायलच्या भेटीचे नियोजन करत नव्हते. सत्य हे आहे की त्यांना फक्त एकासाठी नव्हे तर सर्व सदस्य राष्ट्रांसाठी बोलायचे आहे. जेव्हा सतत संघर्ष चालू असतो तेव्हा तो संघर्ष लवकर संपवण्याची मागणी करणे ही अवास्तव भूमिका नाही. युद्ध लवकर संपावे अशी सर्व जगाची मागणी आहे.



