मुंबईकरांचे हाल ! ‘बेस्ट’च्या कंत्राटी कामगारांचा पाचव्या दिवशीही संप सुरुच.. ‘या’ आहेत संपकऱ्यांच्या मागण्या

मुंबई – पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सलग पाचव्या दिवशी सुरूच आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे मुंबईकरांचे मात्र हाल होत आहेत. बेस्टचे सर्व कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहील, असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड, मुंबई सेंट्रल, प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. बेस्ट परिवहन सेवेतील कंत्राटदारांच्या अखत्यारीत असलेल्या कंत्राटी चालकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या संपामुळे सर्व सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी खासगी वाहनांतून टप्पा प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. संप सुरू असेपर्यंत हे आदेश लागू असणार आहे.
या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. रिक्षा, टॅक्सी, खासगी बसेस, स्कूल बसेस यांमधून प्रवाशांच्या वाहतूकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आली आहे.





