सौदी अरेबीयाला भेट देणार्या भारतीय पर्यटकांची संख्या वाढली; जाणून घ्या 2023मध्ये किती जणांनी दिली भेट?

मुंबई – भारत आणि सौदी अरेबीयादरम्यान व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध वाढत आहेत. त्यामुळे भारतातून सौदी अरेबियाला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. 2023 मध्ये 15 लाख भारतीयांनी सौदीला पर्यटनासाठी भेट दिली. 2022 मधील पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या 50 टक्क्यांनी जास्त आहे. (The number of Indian tourists visiting Saudi Arabia increased)
2019 पासून एकूण पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी दीडशे टक्क्यांनी वाढ होत असल्याचे दिसून येते. भारतातून सौदीला भेट देणार्या पर्यटकांची संख्या वाढावी याकरिता सौदी अरेबीया सरकारने प्रयत्न सुरू केले असून 2030 मध्ये भारतातून 75 लाख पर्यटकांना आकर्षित करण्याच्या योजना तयार करण्यात आल्या आहेत.
सध्या सौदीला भेट देणार्या पर्यटकात भारतीय पर्यटकांची संख्या तिसर्या क्रमांकावर आहे. 2030 पर्यंत ती पहिल्या क्रमांकावर नेण्याचे सौदी सरकारने ठरविले आहे. सौदी सरकारने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तेथील पर्यटन स्थळावर अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आधुनिक पर्यटन स्थळाबरोबरच सौदीतील प्राचीन पर्यटन स्थळे विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे रियाध, जेदाह यासारख्या पर्यटन स्थळांना भेट देणार्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.
भारतामध्ये मध्यमवर्गीयांची संख्या वेगाने वाढत आहे. या नागरिकांना पर्यटनाचे आकर्षण वाढत आहे. याचा फायदा सौदी अरेबियाला होत आहे. त्याचबरोबर अनेक शतकापासून भारतातील बरेच पर्यटक धार्मिक पर्यटनासाठी सौदी अरेबियाला जातात. त्यांची व्यवस्था व्यवस्थित केली जाते. या पर्यटकांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे.
सौदी अरेबिया आणि भारतातील अंतर बरेच कमी आहे. त्यामुळे पर्यटक कमी काळात सौदी अरेबियाला जाऊन पर्यटनाचा आनंद लुटून परत येऊ शकतात. त्यामुळे ही भारतातील पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे सौदी पर्यटन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. त्याचबरोबर भारतीय पर्यटकांच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे दिसून येते.





