Pawan Kalyan : कायदा सगळ्यांसाठी सारखाच! पवन कल्याण यांची अल्लू अर्जुन प्रकरणी स्पष्ट भूमिका; रेवंत रेड्डी यांचे केले कौतुक

Pawan Kalyan – ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची महत्त्वपूर्ण टिप्पणी समोर आली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनवर करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचे सांगून त्याने तेलंगणा पोलिसांना दोषी धरण्यास नकार दिला आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान असून पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेचा विचार करून काम केले पाहिजे.
दरम्यान, एनडीए सहयोगी जनसेना पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांचे कौतुक केले आणि त्यांचे एक चांगला नेता म्हणून वर्णन केले. त्याचवेळी, अभिनेता अल्लू अर्जुनने सर्वप्रथम चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला हवी होती असेही त्यांनी म्हटले.
पवन कल्याण म्हणाले की, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, यावर त्यांनी भर दिला. अशा घटनांमध्ये पोलिस सुरक्षेचा विचार करून काम करतात. मात्र, थिएटर कर्मचाऱ्यांनी अल्लू अर्जुनला परिस्थितीची आधीच माहिती द्यायला हवी होती. एकदा तो आपल्या जागेवर स्थिरावल्यावर गोंधळ हाताळणे कठीण झाले.
दरम्यान, पवन कल्याण आणि अल्लू अर्जुन हे नातेवाईक आहेत. अल्लू अर्जुनची आत्या सुरेखा हिचे लग्न प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवीसोबत झाले आहे, चिरंजीवी हे पवन कल्याण यांचे ज्येष्ठ बंधु आहेत. अशा घटना टाळण्यासाठी अभिनेता काय करू शकला असता असे पवन कल्याण यांना विचारले असता, पवन कल्याण म्हणाले की अल्लू अर्जुनने पीडितेच्या कुटुंबाशी आधी संपर्क साधला असता तर बरे झाले असते. त्यामुळे तणाव कमी होऊ शकला असता.





