कोल्हापूर : पूरपरिस्थिती गंभीर; लष्कराला केले पाचारण

कोल्हापूर – धो धो पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली येथील पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अखेर लष्कराला पाचारण करावे लागले असून लष्काराचे 65 जवानांचे एक यूनिट कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले आहे. आधीच एनडीआरएफच्या पथकाकडून मदत करण्यात येत आहे. मात्र, पुराचा वेढा कायम असल्याने लष्कराची मदत घ्यावी लागली आहे.
कोल्हापूरच्या चिखली आणि आंबेवाडीत NDRF च्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. कोल्हापुरात महापूराने वेढा घातल्याने अनेक नागरिक संकटात अडकले आहेत. त्यांचे आता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जात आहे.
दरम्यान, महापूरामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय पाण्यात असून कार्यालयात तीन ते चार फूट पाणी आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात देखील पाणी शिरले आहे. जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने 2019 च्या भयानक महापुराचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 56 फूट 1 इंचावर जाऊन पोहोचली आहे.





