नवी दिल्ली (वंदना बर्वे) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचे अख्ख मंत्रिमंडळ देशाची राजधानी दिल्ली दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ दोन दिवसाच्या दौऱ्यावर दिल्लीत आले आहे, हे येथे उल्लेखनीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसाच्या दौऱ्यावर दिल्लीत दाखल झाले आहेत.
यामुळे मागील महिनाभरापासून राखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारला अंतिम रूप देतील.
दरम्यान, महाराष्ट्रचे संपूर्ण मंत्रिमंडळ एकाच वेळी दिल्लीत दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असावी. राज्यात दोन सदस्यांचे कॅबिनेट आहे आणि दोन्ही मंत्री दिल्लीत आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘आजादी का अमृतमहोत्सव राष्ट्रीय समितीच्या’ तिसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच, उद्या रविवार (दि.7) रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या 7 व्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
भंडारा व गोंदिया येथील महिला अत्याचार प्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यात येईल.यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.