रेडा – नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने 2018-19 गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 2 हजार 601 रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने एफआरपीची रक्कम 2473 रुपये शेतकऱ्यांना अदा केली आहे. आता उर्वरित ऊस बिलाचा अंतिम हप्ता 128 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाणीप्रश्नी सहकार्य मिळणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
शहाजीनगर येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.18) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अंतिम हप्त्याबरोबर मागील गळीत हंगाम 2017-18 मधील देय रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असे पाटील यांनी नमूद केले.
यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे वार्षिक सभेचे भाषण झाले. प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी केले. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी शासन नियुक्त संचालक अशोक वनवे, कृष्णाजी यादव, नानासाहेब शिंदे, प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, अनिल पाटील, विकास पाटील, किरण पाटील, श्रीमंत ढोले, धनंजय कोरटकर, मनोज पाटील, मंगेश पाटील, दत्तात्रय शिर्के, प्रसाद पाटील, रणजित रणवरे, सुरेश मेहेर, महादेव घाडगे, राजेंद्र कोरटकर, प्रतापराव पाटील, अजिनाथ बोराडे, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, विश्वासराव काळकुटे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, मोहन गुळवे, कैलास हांगे, उमेश सूर्यवंशी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर निलाखे यांनी केले. उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी आभार मानले.
मुख्यमंत्र्यांकडूनच इंदापूर सुजलाम् सुफलाम्
इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी मिळत नसल्याने उसाचे क्षेत्र घटले आहे. आगामी काळात मुख्यमंत्री फडणवीस हे इंदापूर तालुक्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात शेती सुजलाम सुफलाम होईल, असा माझा प्रयत्न राहणार असल्याचे पाटील म्हणाले.