“शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पूजेला यावे.. अन्यथा राज्य स्तरावर आंदोलन करणार” ठाकरे गटाचा इशारा

सोलापूर – गाईच्या दुधाला 40 व म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाववाढ मिळावी तसेच दुधाचे धोरण सरकारने ठरवावे,शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या पूजेला यावे,अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
लंम्पी रोग आणि करोनाच्या लॉकडॉऊन नंतर दुध व्यवसाय उभारी घेत असतांना महाराष्ट्रातील दुध संघानी दुधाचे दर अचानक कमी केले. एका बाजुला पशुखाद्य, पशु वैद्यकीय सेवा, यांचे दर दुप्पट होत असतांना आणि प्रतिलिटर दुधाचा भाव वाढण्याऐवजी दुध संघानी कमी का केला ? याचे उत्तर राज्य शासनाने आणि दुध संघानी शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे.
दुधाची मागणी वाढलेली असतांना दुधाचे दर कमी करुन दुधसंघ नफेखोरी करत आहेत का ? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. ही मागणी गाईच्या दुधाला 40 व म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव वाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दुधाला एफआरपी कायदा लागु करण्यात यावा, महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या नंदिनी आणि गुजतरातच्या अमुल ब्रॅन्डच्या धरतीवरती महाराष्ट्र शासनाने एक ब्रॅन्ड निर्माण करावा आणि ना नफा ना तोटा या धरतीवर दुग्ध व्यवसाय वाढीचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा अशा मागण्या शिवसेनेच्यावतीने करण्यात आल्या .





