वाई (प्रतिनिधी) – वाई-सुरूर रस्त्यावर कृष्णा नदीवरील भद्रेश्वर पुलावर आणि परिसरात वारंवार झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. भीमनगर-भद्रेश्वर पूल-शहाबाग फाट्यापर्यंत मृत्यूच्या तांडवामुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून भद्रेश्वर पूल मृत्यूचा सापळा बनला आहे.
या पुलावर नुकत्याच झालेल्या अपघातात एका महिलेच्या मृत्यूने अनेकांची मने हेलावली. याची प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वाई-सुरूर रस्त्यावर वाई शहरालगत कृष्णा नदीवर भद्रेश्वर पूल आहे. पुणे, मुंबई, वाठार, जोशी विहीर, सुरूर व परिसरातील नागरिक, पर्यटकांसाठी हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने वाहनांची दिवसरात्र वर्दळ असते. यामध्ये पुणे, मुंबईचे चालक बेदरकार गाड्या चालवत असल्याने शहाबागच्या दोन किलोमीटर परिसरात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
भद्रेश्वर पूल अरुंद असल्याने गेल्या काही वर्षांत या परिसरात व पुलावर मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे, तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी गंभीर दखल घेत नसल्याने पर्यायी व्यवस्था करण्यात अपयश येत आहे. याला जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्न उपस्थित वाईकर विचारत आहेत.
भद्रेश्वर पुलावर व परिसरात एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासन तेवढ्यापुरते जागे होते; परंतु संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने अपघातांमध्ये अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. भद्रेश्वर पुलाची नुकतीच काही अंशी डागडुजी करण्यात आली आहे; परंतु ती योग्य प्रकारे झाली नसल्याने पुलावरून जाणे दुचाकीस्वारांना धोकादायक ठरत असल्याचे बोलले जात आहे.
नागरिकांच्या तक्रारींची दखल बांधकाम विभागाने तातडीने घेणे गरजेचे आहे, अन्यथा या पुलावर आणखी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भद्रेश्वर पूल-शहाबाग फाटा व वाठार फाट्याच्या दुतर्फा जागोजागी हळद विक्रीसाठी उभे केलेले स्टॉलही अपघातांना काही प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
वाई शहरात ब्रिटिशकालीन जुना कृष्णा पूल, भद्रेश्वर पूल व लगतचे छोटे-मोठे पूल कृष्णा नदीवर आहेत. हे पूल जीर्ण झाले आहेत. या पुलांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने प्रवाशांसाठी जुना पूल व भद्रेश्वर पूल धोकादायक आहेत. वाईची वाढती लोकसंख्या, शहराचे वेगाने होणारे विस्तारीकरण पाहाता, या पुलांना पर्यायी व्यवस्था होणे निकडीचे आहे, अन्यथा दुर्घटना थांबणार नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.