मुंबई : राज्यातील बाजार समित्यांचा निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये 17 पैकी 17 जागा आमच्याच निवडून येतील, नाही आल्यास माझी मिशी काढून देतो, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केले होते. त्यावर आता ठाकरे गटाकडून प्रतिआव्हान देण्यात आले आहे. “संतोष बांगर यांनी मिशी काढून यावं, आम्ही त्यांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढू,” असे आव्हान हिंगोलीचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी दिले आहे. कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांच्या पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. संतोष बांगर यांच्या पॅनलला फक्त पाच जागांवर विजय मिळवता आला आहे तर महविकास आघाडी 12 जागांवर दणदणीत विजयी झाली आहे. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल त्यांच्याविरोधात गेला. या निकालानंतर आमदार संतोष बांगर यांचा प्रचारा दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार संतोष बांगर यांनी, “कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून येतील, नाही आल्यास माझी मिशी काढून देतो.”असे म्हटले होते. यावर आता ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी बांगर यांना प्रतिआव्हान दिले आहे. “तुम्ही मिशी काढून या, तुम्हाला खांद्यावर घेत मिरवणूक काढू. बांगर यांनी विधानसभेत निवडून येऊन दाखवावं आम्ही राजकारण सोडून देतो,” असे विनायक भिसे यांनी म्हटले आहे. आमदार संतोष बांगर यांना सोशल मीडियावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. आता बांगर साहेब मिशी काढणार का? असा प्रश्न नेटकरी या व्हायरल व्हिडीओनंतर विचारत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत धुव्वा उडाल्यानंतर आता आमदार संतोष बांगर नेमकं काय करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष आहे.