पहलगाममध्ये पुन्हा दहशत! लष्कर-ए-तैयबाने घेतली जबाबदारी; ही पहिली वेळ नाही… जाणून घ्या पर्यटकांवर हल्ल्याचा काळा इतिहास

Terrorin Pahalgam : जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे मंगळवारी (22 एप्रिल 2025) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात 26 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. तर काही जखमी झाले. जखमींना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांनी 250 पेक्षा जास्त राऊंड फायर केले.
लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यामुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतीचे सावट पसरले आहे. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. शाह जम्मू-काश्मीरला पोहोचले आहेत.
पर्यटकांवर हल्ल्याचा काळा इतिहास –
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांना लक्ष्य करणे ही पहिलीच घटना नाही. गेल्या तीन दशकांत दहशतवाद्यांनी अनेकदा पर्यटक, तीर्थयात्री आणि स्थानिकांना लक्ष्य केले आहे. यामुळे खोऱ्यातील पर्यटन आणि धार्मिक गतिविधींना खीळ बसली आहे. काही प्रमुख हल्ल्यांचा इतिहास…
18 मे 2024: श्रीनगरच्या डलगेट परिसरात राजस्थानमधील जयपूरच्या एका जोडप्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यामुळे ते जखमी झाले.
9 जून 2024: रियासी जिल्ह्यात तीर्थयात्री घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात 9 जणांचा मृत्यू, तर 33 जण जखमी झाले. हा हल्ला लष्कराशी संबंधित दहशतवादी गटाने केला.
14 नोव्हेंबर 2005: श्रीनगरच्या लाल चौकाजवळील सिनेमागृहाबाहेर आत्मघाती हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू, तर जपानी पर्यटकासह 17 जण जखमी झाले.
4 जुलै 1995: पहलगामच्या लिद्दरवाट परिसरात हरकत-उल-अंसार या दहशतवादी संघटनेने अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे आणि जर्मनीच्या 6 पर्यटकांसह 2 गाइड्सचे अपहरण केले. नंतर एका पर्यटकाची हत्या करण्यात आली.
20 जुलै 2001: अमरनाथ यात्रेदरम्यान गुफा मंदिराजवळील तीर्थयात्री कॅम्पवर हल्ला झाला, ज्यात 13 जणांचा मृत्यू, तर 15 जण जखमी झाले.
1-2 ऑगस्ट 2000: अनंतनाग आणि डोडा जिल्ह्यात अमरनाथ यात्रेवर हल्ले झाले. पहलगामच्या नुनवान बेस कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात 21 तीर्थयात्री, 7 दुकानदार आणि 3 सुरक्षाकर्मी मारले गेले. एकूण 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
पर्यटन आणि शांततेला खीळ –
या हल्ल्यांमधून दहशतवाद्यांचा उद्देश काश्मीरमधील पर्यटन आणि धार्मिक गतिविधींना खीळ घालणे हा आहे. यामुळे खोऱ्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो आणि जम्मू-काश्मीरची प्रतिमा डागाळली जाते. सध्याच्या हल्ल्याने केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांसमोर पर्यटक आणि तीर्थयात्री यांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान उभे आहे. दहशतवादी नेटवर्कचा नायनाट करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे, जेणेकरून काश्मीर पुन्हा शांततेचा स्वर्ग बनेल.





