Dehu Nagar Panchayat : निविदा संपल्या, मुदतवाढीचा आधार; देहू नगरपंचायतीत वर्ष-दोन वर्षांपासून नवीन निविदा प्रक्रियेला विलंब
Dehu Nagar Panchayat : देहू नगरपंचायतीत वर्ष-दोन वर्षांपासून नवीन निविदा प्रक्रियेला विलंब

रामकुमार आगरवाल
देहूगाव – देहू नगरपंचायतीतील विविध नागरी सुविधांच्या कामांच्या निविदांची मुदत संपून वर्ष-दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अनेक कामांसाठी अद्याप नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.
नवीन निविदा होईपर्यंत संबंधित ठेकेदारांनाच मुदतवाढ देऊन कामे सुरू ठेवली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नगरपंचायतीकडून शहरातील दैनंदिन नागरी सुविधांशी संबंधित विविध कामे कंत्राटी पद्धतीने करून घेतली जातात. यामध्ये नाले-गटारे व सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, रस्ते साफसफाई, कचरा संकलन, चेंबर स्वच्छता, धूर फवारणी, विद्युत पोल दुरुस्ती, कंत्राटी कामगार पुरवठा, पाणीपुरवठा पाइपलाइन दुरुस्ती, जलशुद्धीकरण, अल्पोपहार-जेवण व्यवस्था, फ्लेक्स, वाहनतळ, जलपर्णी निर्मूलन, बाजार-पथारीकर आदी कामांचा समावेश आहे.
यातील काही कामांच्या निविदांची मूळ मुदत संपून नऊ-दहा महिने झाले आहेत. तर काही कामांच्या निविदांना दीड ते दोन वर्षांचा कालावधी उलटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी मुदतवाढीच्या माध्यमातून जुन्याच ठेकेदारांकडून कामे करून घेतली जात असल्याने या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.
निविदेची मुदत संपण्यापूर्वीच पुढील निविदा प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित असते. त्यामुळे एका निविदेची मुदत संपल्यानंतर दुसऱ्या निविदेतील ठेकेदाराला काम सुरू करता येते. मात्र, देहू नगरपंचायतीतील काही कामांच्या बाबतीत ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नसल्याचा आरोप होत आहे.
नवीन निविदा प्रक्रिया राबविल्यास विविध ठेकेदारांना स्पर्धेची संधी मिळते. स्पर्धेमुळे कामाचा दर्जा सुधारण्याबरोबरच नगरपंचायतीच्या खर्चातही बचत होण्याची शक्यता असते.
मात्र, दीर्घकाळ नवीन निविदा निघत नसल्यास जुन्याच ठेकेदारांचे काम सुरू राहते. त्यामुळे नव्या ठेकेदारांना संधी मिळत नाही. स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेचा उद्देशही बाधित होऊ शकतो. परिणामी नगरपंचायतीला आर्थिकदृष्ट्या फायदा होतो की नुकसान, याचे स्वतंत्रपणे परीक्षण करण्याची गरज आहे.
त्यामुळे निविदेची मुदत संपल्यानंतरही त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्याची वेळ का येते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे का?
निविदेच्या अटी-शर्ती निश्चित करण्यास विलंब होत आहे का? प्रशासकीय मंजुरी किंवा इतर प्रक्रियेमध्ये अडथळे आहेत का? याबाबत नगरपंचायतीने स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ठेकेदारांवर अधिकारी-नगरसेवक मेहरबान?
निविदेची मुदत संपून बराच कालावधी उलटल्यानंतरही नवीन निविदा काढली जात नसेल आणि त्याच ठेकेदारांना वारंवार मुदतवाढ दिली जात असेल, तर यामागील प्रशासकीय कारणे नागरिकांसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे.
निविदा संपल्यानंतरही त्याच ठेकेदाराला काम देण्याची गरज का भासते, असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अधिकारी आणि नगरसेवक संबंधित ठेकेदारांवर मेहरबान आहेत का, अशी चर्चाही शहरात सुरू झाली आहे.





