Rice : तांदूळ उत्पादनात 70 लाख टनांची घट? कमी पाऊस, लागवड घटल्याचा फटका
Rice : देशातील खरीप तांदळाच्या लागवड क्षेत्रात १४.३६ लाख हेक्टरची घट झाली आहे. कमी पावसामुळे यंदा तांदूळ उत्पादन ७० लाख टनांनी घटण्याचा अंदाज आहे.

Rice : देशातील खरीप हंगामातील तांदळाच्या लागवड क्षेत्रात यंदा सुमारे १४.३६ लाख हेक्टरने घट झाली आहे. त्यातच अनेक भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने तांदूळ पिकाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा देशातील तांदूळ उत्पादनात सुमारे ७० लाख टनांची घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, उत्पादन घटले तरी जागतिक तांदूळ बाजारातील भारताचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील खरीप तांदळाचे सरासरी लागवड क्षेत्र ४१२ लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षी विक्रमी ४२८.४६ लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड झाली होती. यंदा हे क्षेत्र ४१४.१० लाख हेक्टरवर आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत लागवड क्षेत्रात १४.३६ लाख हेक्टरची घट झाली आहे.
कर्नाटक, तेलंगणाला सर्वाधिक फटका –
राज्यनिहाय पाहता कर्नाटकात ३.६१ लाख हेक्टर, तेलंगणात ३.२९ लाख, झारखंडमध्ये १.८२ लाख, मध्य प्रदेशात १.७५ लाख, तमिळनाडूत १.२२ लाख, महाराष्ट्रात १.०२ लाख, आसाममध्ये १.२१ लाख, उत्तर प्रदेशात ७० हजार आणि हरियाणात १५ हजार हेक्टरने तांदळाच्या लागवडीत घट झाली आहे. कर्नाटक, तेलंगणा, झारखंड आणि मध्य प्रदेशात घट सर्वाधिक आहे.
उत्पादन १,४७० लाख टनांवर येण्याचा अंदाज –
गेल्या वर्षी विक्रमी लागवड आणि चांगल्या पावसामुळे देशात १,५४० लाख टन तांदळाचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र एल-निनोच्या प्रभावामुळे अनेक भागांत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे लागवडीसोबतच उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा उत्पादन सुमारे ७० लाख टनांनी घटून १,४७० लाख टनांवर येण्याचा अंदाज आहे.
मोठा साठा असल्याने निर्यातीला आधार –
उत्पादन घटण्याची शक्यता असली तरी देशातील तांदळाचा साठा समाधानकारक आहे. ऑगस्टअखेर केंद्र सरकारकडे ६३९ लाख टन तांदळाचा साठा होता. हा साठा निर्धारित संरक्षित साठ्यापेक्षा सुमारे पाचपट अधिक आहे. अन्नसुरक्षा, इथेनॉलसह अन्य गरजांसाठी देशाला वर्षाला सुमारे ४५० लाख टन तांदळाची आवश्यकता असते. त्यामुळे देशांतर्गत गरज भागवल्यानंतरही निर्यातीसाठी पुरेसा तांदूळ उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. परिणामी उत्पादनात घट झाली तरी जागतिक तांदूळ बाजारात भारताचा दबदबा कायम राहील, असा अंदाज जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शाह यांनी व्यक्त केला.





