Tamil Nadu Elections 2021 : कॉंग्रेस-द्रमुक समझौता; दोन्ही पक्षांचं जागा वाटप निश्चित

चेन्नाई – तामिळनाडु विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुक आणि कॉंग्रेस पक्षामध्ये अखेर निवडणूक समझौता झाला असून दोन्हीं पक्षांनी जागा वाटप निश्चिीत केले आहे. त्यानुसार कॉंग्रेस पक्ष त्या राज्यात 25 जागा लढवणार आहे. या आधीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने 41 जागा लढवल्या होत्या त्यातील 8 जागा त्यांनी जिंकल्या होत्या.
यावेळी द्रमुकने त्यांना 24 पेक्षा अधिक जागा देण्यास अनुमती नाकारली होती. कॉंग्रेसने किमान 30 जागांची अपेक्षा व्यक्त केली होती. पण अखेर कन्याकुमारीची लोकसभेची पोटनिवडणूकही कॉंग्रेसला देऊन विधानसभेच्या 25 जागांवर समझौता झाला आहे.
कॉंग्रेसचे तामिळनाडुतील प्रभारी दिनेश गुंडुराव यांनी आज सकाळी द्रमुक मुख्यालयात जाऊन या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुंडुराव म्हणाले की या निवडणुकीत आम्ही विरोधी आघाडीचा दारूण पराभव करू.
विरोधकांना पुर्ण नेस्तानबुत करण्यासाठीच आम्हीं ही आघाडी केली असून आमची ही आघाडी खूप वर्षांपासून आहे. आणि सर्व मतदार संघात कॉंग्रेसचे कार्यकर्ते द्रमुक पक्षांशी एकदिलाने निवडणुकीचे काम करतील असा विश्वासही गुंडुराव यांनी व्यक्त केला.
तामिळनाडूत सत्तारूढ अद्रमुक आणि भाजप यांच्यात आघाडी झाली असून भाजला या राज्यात अद्रमुकने 20 जागा दिल्या आहेत. राज्यात पुन्हा सत्ता आल्यास भाजपला सरकार मध्ये स्थान मिळणार नाही असे अद्रमुकने या आधीच स्पष्ट केले आहे.





