विकासावर बोला, सत्ता संघर्षाच्या निकालाशी सामान्य जनतेला देण घेणं नाही – संभाजीराजे

नांदेड – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आता काही वेळातच जाहीर होणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळात धावपळ सुरू झाली आहे. मात्र असे असतानाच स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याच्या सत्ता संघर्षाच्या निकालाशी सर्वसामान्य जनतेला काहीही घेणं देणं नसल्याचे विधान केले आहे. या मुद्यावरून संभाजीराजे यांनी सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले संभाजीराजे ?
“खुर्ची टिकवण्यासाठी आमदारांची धावपळ सुरु झाली आहे. सध्या शेतकऱ्यांची बिकट आवस्था आहे. त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही विकासावर बोला, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना कशी आणता येईल यावर चर्चा करा,” असा सल्ला संभाजीराजे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी आज लागणाऱ्या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत सर्वसामान्य जनतेला काही देण घेण नाही. राजकारणात सध्या पोरखेळ सुरु असून महाराष्ट्र हा सुसंस्कृत राहिला नसल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणीदरम्यान निकालासंदर्भात टिप्पणी केली.
या खटल्याची सुनावणी करणाऱ्या घटनापीठाचे एक न्यायाधीश 15 तारखेला निवृत्त होत असल्यामुळे याच आठवड्यात निकाल लागेल, असे बोलले जात होते. या निकालावरच महाराष्ट्राचं पुढचं राजकीय भवितव्य ठरणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.





