T20 World Cup 2024 : विश्वविजेत्या भारतीय संघात 125 कोटींच्या बक्षीस रक्कमेचे कसे झाले वाटप, जाणून घ्या कोणाला किती मिळाले पैसे…

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 29 जून रोजी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. या शानदार विजयानंतर बीसीसीआयचीही तिजोरी उघडली. ही बक्षीस रक्कम संघातील सदस्यांमध्ये कशी वाटली जाणार, याबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती. आता एका अहवालात ही बाब समोर आली आहे.
बीसीसीआयने विजेत्या संघाला 125 कोटी देण्याची घोषणा केली. त्यामुळे संघातील 15 खेळाडूंना पाच कोटी मिळणार आहे. या पंधरा खेळाडूंमध्ये तीन खेळाडू असे आहेत, जे एकही सामना खेळले नाही. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही एकूण बक्षीस रकमेपैकी 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.
उर्वरित रक्कमेतील कोचिंग स्टाफला प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मिळतील. भारतीय संघाच्या वरिष्ठ निवड समितीच्या पाच सदस्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जातील. त्यामध्ये अजित आगरकरचाही समावेश आहे. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांना अडीच कोटी रुपये देण्यात येणार आहे. त्याच वेळी, फिजिओथेरपिस्ट, थ्रोडाउन स्पेशालिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यासारख्या इतर बॅकरूम स्टाफला प्रत्येकी 2 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
संघाचे चार राखीव खेळाडू रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार आहे. भारतीय संघात असणारे यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल हे संघात होते पण त्यांनी एकही सामना खेळला नाही. परंतु त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळणार आहेत.





