Suryakumar Yadav Revealed : “सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक बदल का?” आगरकरांच्या ‘त्या’ कॉलबद्दल सूर्याचा पहिल्यांदाच खुलासा
Suryakumar Yadav Revealed : कर्णधारपदावरून हटवून थेट संघातूनच वगळण्यात आल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.

Suryakumar Yadav Breaks Silence On T20 Captaincy Removal Aakash Chopra Interview : भारताला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला कर्णधारपदावरून हटवून थेट संघातूनच वगळण्यात आल्यानंतर त्याने पहिल्यांदाच उघडपणे आपली भूमिका मांडली आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत सूर्याने संघातून वगळल्यानंतरचा मानसिक संघर्ष आणि निवड समितीच्या संभाषणाचा धक्कादायक खुलासा केला. संघातून नाव वगळल्याचे समजताच आपल्या चेहऱ्यावर उपरोधिक हास्य उमटल्याचे सांगत, कठीण प्रसंगात स्वतःला शांत ठेवण्यासाठी आपण हसल्याचे त्याने नमूद केले.
‘आता पुढे जाण्याची वेळ आली आहे!’; निवड समितीच्या फोननंतर बसला धक्का
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर होण्याच्या २-३ दिवस आधी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांचा थेट फोन आल्याचे सूर्याने सांगितले. “त्यांनी मला फोन करून सांगितले की आता संघाने पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी त्यावर कोणतीही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली नाही. हा निर्णय संघाच्या हितासाठी असेल असे मला वाटले. पण मी क्रिकेट खेळणे सोडणार नाही; जेव्हा योग्य वेळ वाटेल आणि गरज भासेल, तेव्हा मला बोलवा, मी नेहमी सज्ज आहे, असे मी त्यांना स्पष्ट सांगितले,” असे सूर्यकुमार म्हणाला.
‘सगळं सुरळीत सुरू असताना बदल का?’; दीड महिना घरात बसून विचार करत होतो!
🚨 Suryakumar Yadav revealed the worst phase of his life. 🚨
Aakash Chopra Asked 🗣️: How did you feel after being dropped from the Team India squad, and what was the worst phase of your life?
Surya Kumar Yadav Said 🗣️: “Honestly, I was very disappointed after hearing this. I… pic.twitter.com/AtcLKvuf8Z
— lndian Sports Network (@IS_Netwrk29) August 29, 2026
आपल्या नेतृत्वाखालील यशाचा पाढा वाचताना सूर्याने खंत व्यक्त केली. “गेल्या दोन वर्षांत माझ्या नेतृत्वाखाली भारताने एकही टी-२० मालिका गमावली नव्हती. आम्ही आशिया कप आणि टी-२० विश्वचषकही जिंकला होता. त्यामुळे सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना अचानक इतका मोठा बदल करण्याचे कारण काय? हा प्रश्न मला सतत सतावत होता. आपण नुकताच विश्वचषक जिंकलाय, मग असं कसं घडू शकतं? याच विचारात मी जवळपास दीड महिना घरी बसून होतो,” असे मनोगत त्याने व्यक्त केले.
श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाचे समर्थन; ऑलिम्पिकपर्यंत खेळण्याची होती इच्छा!
Surya spoke his heart out — honest, emotional and straight from the heart. Baith&Bol Episode-1 releasing on 28 August 2026, 6 P.M. pic.twitter.com/7TDoCX0OvS
— Aakash Chopra (@cricketaakash) August 23, 2026
नवा कर्णधार श्रेयस अय्यरबाबत बोलताना सूर्या म्हणाला, “श्रेयस एक उत्तम खेळाडू, चांगला व्यक्ती आणि उत्तम कर्णधार आहे, त्यामुळे त्याच्या निवडीवर माझा कोणताही आक्षेप नाही.” मात्र, भारतीय संघाला आणखी दोन वर्षे पुढे नेऊन आगामी ऑलिम्पिक आणि पुढच्या टी-२० विश्वचषकापर्यंत संघाचे नेतृत्व करण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगत, “तुम्ही काय विचार करता आणि समोरची व्यक्ती काय विचार करते, यात जमीन-अस्मानाचा फरक असतो,” असे म्हणत त्याने क्रिकेट प्रशासनाच्या निर्णयावर अप्रत्यक्ष नाराजी दर्शवली.





