नवी दिल्ली : तुम्ही तुमचे घरच कुत्र्यांसाठी का खुले करत नाही. प्राणीप्रेमींना वाटते की प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली प्राण्यांसाठी सोडली जावी, त्यांना माणसांशी काही देणेघेणे नाही अशी कठोर टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. नोएडामध्ये विविध ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्याचे ठिकाण (फिडर पॉइंट) उभारणाऱ्या महिलेच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. तथापि, या तीव्र टिप्पणीनंतर न्यायालयाने हे प्रकरण या विषयावर आधीच प्रलंबित असलेल्या याचिकांशी जोडले. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणाऱ्या एका महिलेने म्हटले होते की तिच्या परिसरातील लोक ती कुत्र्यांना खायला घालते म्हणून तिला त्रास देतात. त्यावर न्यायालयाने नोएडा प्रशासनाला प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ च्या तरतुदींनुसार प्रत्येक भागात कुत्र्यांना खायला घालण्याचे ठिकाण उभारण्यास सांगितले. दरम्यान, याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने म्हटले की, आम्ही तुम्हाला तुमचे घर कुत्र्यांचे आश्रयस्थान बनवण्याचा सल्ला देतो. तुमच्या परिसरातील प्रत्येक कुत्र्याला तिथे ठेवा आणि त्यांना खायला द्या. यानंतर, न्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला विचारले की तुम्ही सकाळी सायकल चालवता का? तुम्ही तसे प्रयत्न करावेत, मग तुम्हाला कळेल. याचिकाकर्त्याने सांगितले की ती मॉर्निंग वॉकसाठी जाते. यावर न्यायालयाने म्हटले की, पादचाऱ्यांनाही कुत्र्यांपासून धोका असतो, परंतु सायकल किंवा दुचाकी चालवणाऱ्यांसाठी हा धोका आणखी मोठा आहे. आपल्यामध्ये काही मोठ्या मनाचे लोक आहेत ज्यांना प्रत्येक रस्ता प्राण्यांच्या नावावर करायचा आहे.माणसांसाठी कोणती जागा नसावी असा या लोकांचा हिशेब आहे अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी या महिलेने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, प्रशासनाने प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि इतर नियमांचे पालन करून भटक्या प्राण्यांसाठी व्यवस्था करावी, परंतु कोणतीही व्यवस्था करण्यापूर्वी लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे.