Pradeep Sharma – मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना 2006 च्या बनावट चकमक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुढील आदेशापर्यंत आत्मसमर्पण करण्यापासून दिलासा दिला आहे. आत्मसमर्पण करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात प्रदीप शर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने शर्मा यांना पुढील आदेशापर्यंत अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्यापासून सूट दिली आहे. (supreme court relief to former mumbai police officer pradeep sharma in 2006 fake encounter case)
19 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने शर्मा यांना बनावट चकमक प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण छोटा राजन टोळीचा कथित सदस्य रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया याच्या चकमकीत मृत्यूशी संबंधित आहे. गुप्ता आणि त्याच्या मित्राला 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबईच्या उपनगरीय भागातून उचलण्यात आले होते. त्याच दिवशी चकमकीत गुप्ता मारला गेला.
2009 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष तपास पथकाने गुप्ता यांना मारण्यासाठी प्रतिस्पर्ध्याने पोलिसांना पैसे दिल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे एसआयटीची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये एफआयआर नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पाच वर्षांच्या खटल्यानंतर, मुंबई ट्रायल कोर्टाने जुलै 2013 मध्ये शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली परंतु 13 पोलिस कर्मचाऱ्यांसह 21 जणांना दोषी ठरवले. तीन पोलिसांना हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले, तर उर्वरित 18 जणांना भडकावल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले.
ही चकमक बनावट असल्याचा दावा करत दोषमुक्तीच्या आदेशाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले. पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यांच्या शिक्षेला आव्हान देणारे अपील दाखल केले. विस्तृत सुनावणीनंतर उच्च न्यायालयाला शेवटी राज्य सरकारच्या युक्तिवादात योग्यता आढळली आणि शर्मा यांना दोषी ठरवले. तसेच 12 अन्य पोलीस अधिकारी आणि हितेश सोलंकी या नागरिकाची शिक्षा कायम ठेवली.
वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि वकील सुभाष जाधव यांनी शर्मा यांची बाजू मांडली. ही घटना सुमारे 20 वर्षांपूर्वी घडली होती. तसेच प्रदीप शर्मा हे गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित नव्हते तर त्यांचे रिव्हॉल्व्हर वापरले गेले होते, असा दावा त्यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात 13 इतर आरोपी, यात 12 माजी पोलिस अधिकारी आणि एका नागरिकाला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती. तर पुराव्याअभावी शर्मा यांची निर्दोष मुक्तता करणारा सत्र न्यायालयाचा 2013 चा निकाल रद्द केला होता.
नेमके प्ररकण काय?
11 नोव्हेंबर 2006 रोजी पोलिसांच्या एका पथकाने रामनारायण गुप्ता उर्फ लख्खन भैय्या याला नवी मुंबईतील वाशी परिसरातून त्याचा मित्र अनिल भेडा यांच्यासह उचलून नेले होते. तसेच त्याच संध्याकाळी पश्चिम मुंबईतील वर्सोवाजवळ झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला होता.
नेमके कोण आहेत प्रदीप शर्मा
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 1983 मध्ये मुंबई पोलिसात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. शर्मा यांनी माहीम पोलिस ठाण्यातून नोकरीला सुरुवात केली. यानंतर त्यांची काही वर्षांसाठी विशेष शाखेत बदली झाली. प्रदीप शर्मा हे घाटकोपर आणि जुहू पोलिस ठाण्यांसारख्या मोठ्या पोलिस ठाण्यांचेही प्रभारी होते. त्यावेळी घाटकोपर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारण्याची भीती प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला वाटत होती, मात्र प्रदीप शर्मा आल्यानंतर गुन्हेगारांनी तो परिसर टाळल्याचे बोलले जाते.
प्रदीप शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला आहे. त्यांचे वडील महाराष्ट्रातील धुळे येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत प्राचार्य होते. प्रदीप शर् यांचे एमएससीपर्यंत शिक्षणही धुळे येथेच पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी पोलिस परिक्षा दिली, त्यात ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र पोलिसात रुजू होण्याची संधी मिळाली.
प्रदीप शर्मा यांच्यावर अनेक गंभीर आरोप
प्रदीप शर्मा यांच्यावर पोलिस सेवेत असताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून त्यांच्या प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांना बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप आहे. 2004 मध्ये इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा यांनी कांदिवली क्राइम ब्रँच युनिटचा पदभार स्वीकारला. येथे रुजू झाल्यानंतर काही काळातच ते वादात सापडले. दोन वर्षांनी त्यांची येथून अमरावती येथे बदली झाली. अमरावतीत रुजू झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना येथेही एका प्रकरणामुळे निलंबित करण्यात आले. त्याच्या निलंबनादरम्यानच त्याच्यावर लखन भैय्याचा खून केल्याचा आरोप आहे.