पुणे – एप्रिल ते जून या महिन्यात उष्णतेची लाट येणार असल्याचे भाकित हवामान खात्याने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. संपूर्ण भारतात यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याचा अंदाज शनिवारी भारतीय हवामान खात्याने केला आहे. त्यामध्ये अन्य शहरांसह पुण्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे पुणेकरांनो यंदाच्या उन्हाळ्यात स्वत:ला सांभाळा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दिवसेंदिवस पारा वाढत चालला आहे. नियमित कामावर जाण्याऱ्यांनी आपल्या खानपानाची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासोबतच दुपारच्या दरम्यान बाहेर फिरणाऱ्यांनी सर्वात जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. आरोग्यासोबतच नियमित व्यायाम आणि सकस आहार देखील घेणं आवश्यक आहे.
यंदाचा उन्हाळा हा लहान मुलांसाठी देखील अतिशय त्रासदायक असणार आहे. सध्या सुरु असलेले साथीचे आजार किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणं आवश्यक आहे. लहान मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
काय घ्यावी काळजी?
तिखट, तेलकट, चमचमीत पदार्थ खाऊ नये; विशेषत: पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी
अतिथंड पदार्थ खाऊ नयेत. यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी होऊ शकते.
रस्त्यावरील पदार्थांचे सेवन, सरबते पिऊ नयेत. यामध्ये बर्फाचा दर्जा आणि रासायनिक रंगाचा वापर केलेला असतो, यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
वातानुकूलित यंत्रणेत आणि बाहेरील वातावरणात असलेल्या तापमानात सतत जा-ये करू नये.
पोषक आणि ताजे अन्न खावे. ते हलके, पचायला सोपे असावे.
बाहेरील तयार सरबतांपेक्षा शहाळे, लिंबूपाणी, ताक, पन्हे, कोकम सरबत प्यावे.
बेकरी पदार्थ टाळावेत
टळटळीत उन्हात जाणे टाळा. पर्याय नसेल तर डोक्यावर टोपी, रुमाल, गमछा बांधून, गॉगल घालून बाहेर पडा. पाण्याची बाटली सोबत ठेवा.