Singer Death : संगीतविश्वाला मोठा धक्का..! रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिकेचं निधन
Singer Death : भारतीय संगीतविश्वावर अनेक दशके आपल्या अवीट, मधुर आणि भावस्पर्शी स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी दुःखद निधन झाले.

Singer Death : भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. (Singer Death)
मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपटसंगीत या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य मानलं जातं. त्यांच्या निधनानंतर कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. (Singer Death)
बांगलादेशातील भवानीपूर येथे झाला जन्म
२८ जानेवारी १९३७ रोजी तत्कालीन अविभाजित भारतातील भवानीपूर (आताचा बांगलादेश) येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या सुमनताईंनी संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. त्यांचे माहेरचे आडनाव ‘हेमाडी’ असल्याने सुरुवातीच्या काळात त्या ‘सुमन हेमाडी’ या नावाने गायन करत होत्या. (Singer Death)
तलत महमूद यांनी दिली पहिली संधी
संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रवास एका सार्वजनिक कार्यक्रमातून सुरू झाला. एका कार्यक्रमात त्यांचे गायन ऐकून ज्येष्ठ गायक तलत महमूद प्रभावित झाले. त्यांनी आपल्या चित्रपटासाठी त्यांना गाण्याची संधी दिली आणि तिथूनच सुमन कल्याणपूर यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. (Singer Death)
मराठी संगीत क्षेत्रातही त्यांनी अनेक अजरामर गीते दिली. विशेषतः भावगीतांच्या माध्यमातून त्यांनी घराघरांत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
हजारो गाण्यांनी सजवला संगीतप्रवास
सुमन कल्याणपूर यांनी मराठी आणि हिंदीसह बंगाली, पंजाबी, उडिया, भोजपुरी, राजस्थानी आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी, भक्तीगीत आणि चित्रपटगीत या सर्वच प्रकारांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची छाप सोडली. (Singer Death)
त्यांच्या गायकीतील शास्त्रीयतेचा ठसा कायम जाणवत असे. त्यांनी गायलेल्या “मन मोहन मन में हो तुम्ही” या गीताला प्रतिष्ठेचा तानसेन पुरस्कार मिळाला होता.
मराठी रसिकांच्या मनात कायम घर करणारी गाणी
- जिथे सागरा धरणी मिळते
- घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
- माहेरी जा सुवासाची कर बरसात
- निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
- कशी गवळण राधा बावरली
- नाविका रे वारा वाहे रे
- केतकीच्या बनी तेथे नाजला ग मोर
- उठा उठा चिऊताई
- या लाडक्या मुलांना यो
- गाजलेली भावगीते आणि भक्तीगीते :
- अक्रुरा नको नेऊ माधवा
- आकाश पांघरुनी
- केतकीच्या बनी तिथे
- केशवा माधवा
- जुळल्या सुरेल तारा
- जेथे जातो तेथे
- नकळत सारे घडले
- वाट इथे स्वप्नातिल
- शब्द शब्द जपुनि ठेव
पद्मभूषण पुरस्काराने गौरव
संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने २०२३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार या देशातील प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरविले होते.
संगीतविश्वातील एका युगाचा अंत
सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक मोठा आधारवड कोसळला आहे. त्यांच्या स्वरांचा गोडवा, भावगीतांतील कोमलता आणि गायकीतील सात्विकता यामुळे त्या कायम स्मरणात राहतील. त्यांची गाणी आणि त्यांचा आवाज पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. (Singer Death)





