Sugar Price Hike : साखरेच्या दरवाढीमागे ‘ही’ 2 कारणं; माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा दावा
Sugar Price Hike : साखरेचा किरकोळ दर 80 रुपये किलोवर पोहोचला आहे. साखरेच्या दरवाढीमागे कमी उत्पादन आणि इथेनॉलसाठी ऊस वळवल्याची दोन प्रमुख कारणं शेखर गायकवाडांनी सांगितली.

Sugar Price Hike : राज्यात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून किरकोळ बाजारात साखरेचा दर तब्बल 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. घाऊक बाजारात साखरेचा दर 7,500 रुपये क्विंटलच्या जवळ असल्याची माहिती आहे.
साखरेच्या या दरवाढीमागे नेमकी कारणे कोणती, याबाबत माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन प्रमुख कारणे सांगितली आहेत.
गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, देशात दरवर्षी सुमारे 285 लाख टन साखरेची गरज असते. मात्र, गेल्या दोन वर्षांत उसाखालील क्षेत्र आणि उसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे साखरेच्या उत्पादनावर परिणाम झाला. 2024-25 मध्ये देशात 259 लाख टन, तर 2025-26 मध्ये 274 लाख टन साखरेचे उत्पादन झाले.
साखरेचं उत्पादन घटलं, इथेनॉलकडे ऊस वळला –
साखरेच्या दरवाढीचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा वापर वाढल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. मागील वर्षी इथेनॉलसाठी 50 लाख टन ऊस वापरण्यात आला, तर यंदा 35 लाख टन ऊस इथेनॉलकडे वळवण्यात आला. कारखान्यांना इथेनॉलचे पेमेंट दर 21 दिवसांनी मिळत असल्याने त्याचा फायदा होत होता.
शेतकरी संघटनांचा दबाव आणि इतर बाबींचा विचार करून केंद्र सरकारने साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याचे धोरण स्वीकारले. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला. अपेक्षेपेक्षा साखरेचे उत्पादन कमी, तर इथेनॉलचे उत्पादन अधिक झाल्याने साखरेच्या बाजारातील समतोल बिघडल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील काय म्हणाले?
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनीही साखरेच्या दरवाढीमागे गतवर्षीचे कमी उत्पादन हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. बाजारात पुरवठा कमी झाला की दर वाढतात, हा बाजाराचा नियम आहे. एफआरपी आणि इतर कारणांमुळे 80 ते 90 टक्के साखर विकली गेली आहे. आगामी काळात उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने दर वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी आणि चांगला भाव मिळणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात केंद्र सरकारकडे सादरीकरण करण्यात आले असून एमएसपी आणि एफआरपी यांची सांगड घालून शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, इथेनॉलच्या दराबाबतही अडचणी असल्याचे पाटील यांनी सांगितले. ग्रीन बेस इथेनॉलच्या दरात फरक असून त्याचे नियंत्रण केंद्र सरकारकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





