Sanjay Raut : काश्मिरमध्ये एवढं मोठं हत्याकांड झालंय; अन् पंतप्रधान टंगळमंगळ करत फिरतात, संजय राऊतांची मोदींवर बोचरी टीका

Sanjay Raut : मुंबईत वेव्हज २०२५ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थित मुंबईला नवी चित्रनगरी मिळाली आहे. या कार्यक्रमात अनेक विविध कलाकारांनीही हजेरी लावली आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नट-नट्यांबरोबर वेळ घालवत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. Sanjay Raut ।
काय म्हणाले संजय राऊत?
ज्या देशात युद्धाची तयारी असते त्या देशातील पंतप्रधान राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाहीत. काश्मिर मध्ये एवढं मोठं हत्याकांड झालं आहे, मात्र त्यानंतर देखील आमचे पंतप्रधान बिहारला प्रचाराला गेले. पाकिस्तानला धडा शिकवू म्हणाले, पण ९ तास ते नट-नट्यांबरोबर राहिले. देशात युद्धाची चर्चा सुरू असताना ९ तास पंतप्रधान नट-नट्यांबरोबर राहतात, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, काल फोटो आले, गौतम अदाणी यांच्या एका बंदराच्या उद्घाटनाला गेले. त्यांना मिठ्या मारल्या. आणखी एका कार्यक्रमात आंध्राचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याबरोबर हास्यविनोद करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर युद्धाबाबत कसलीही चिंता दिसत नाही. ज्या देशाला पाकिस्तान आणि चीनसारखा शेजार लाभला आहे, त्या देशात सतत युद्धसराव सुरूच असतो. पण सध्या सरकारचं वर्तन पाहता ते युद्धाला सामोरे जात आहेत, असं वाटत नाही, असंही राऊत म्हणाले.
सर्वाला जबाबदार अमित शाह आहेत
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा केली. देशाच गृहमंत्री अमित शाह ‘चुनचुन के मारेंगे’ म्हणाले. मग मारा ना. कोणी अडवलं तुम्हाला? या सर्वाला जबाबदार अमित शाह आहेत. काश्मीरमध्ये जे हत्याकांड घडलं आहे, तसंच, गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक हत्याकांडाला अमित शाह जबाबदार आहेत. तरीही मोदींनी त्यांना पदावर का ठेवलंय? २७ जणांचं हत्याकांड झालं आहे. त्यामध्ये राज्यातील ६ माणसं आहेत. आमच्याच लोकांना चुन चुन के मारलंय. त्यामुळे अमित शाहांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.





