Mallikarjun Kharge : “मुलांना न्याय हवा आहे, दडपशाही नको” – मल्लिकार्जुन खर्गे
दिवस उत्सव साजरा करण्याचा नसून सरकारला जाब विचारण्याचा आणि लोकशाही पुनर्स्थापित करण्याचा आहे, असे त्यांनी सोशल मिडियावरवर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.

Mallikarjun Kharge : देशातील विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार, अश्रूधुराचा मारा आणि परीक्षांमधील घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी ८४ व्या वर्षात पदार्पण करताना आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजचा दिवस उत्सव साजरा करण्याचा नसून सरकारला जाब विचारण्याचा आणि लोकशाही पुनर्स्थापित करण्याचा आहे, असे त्यांनी सोशल मिडियावरवर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.
सोमवारी ‘संसद चलो’ आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत खर्गे म्हणाले की, न्यायाची मागणी करणाऱ्या तरुणांच्या आवाजाला उत्तरांऐवजी बळाचा वापर करून दाबण्यात आले.
‘लोकशाहीची जननी’ आपल्या मुलांशी असा व्यवहार करत नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
संसदेत पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर तातडीने सविस्तर चर्चा व्हावी, सुरक्षित डिजिटल प्रश्नसंच आणि २१ व्या शतकातील विद्यार्थी-केंद्रित परीक्षा प्रणाली लागू करावी, परीक्षेत अनियमितता झाल्यास विद्यार्थ्यांना कायदेशीर संरक्षण,
अनिवार्य फेरपरीक्षा आणि नुकसानभरपाई मिळावी तसेच शिक्षण व्यवस्था राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त आणि गुणवत्तेवर आधारित असावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या.






