पुणे – ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शस्त्रनिर्मिती बंद असून, संप 30 दिवस कायम राहिल्यास उद्दिष्टापैकी 1.60 टक्के लष्करी उत्पन्नावर परिणाम होण्याचा अंदाज ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरींचे निगमीकरण (कॉर्पोरेटायझेझन) करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी फॅक्टरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांतर्फे 30 दिवसांचा देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, यामध्ये देशभरातील सर्व आर्डनन्स फॅक्टरीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. पुण्यातील खडकी, देहूरोड आणि तळेगाव येथील शस्त्रनिर्मिती कारखान्यांमधील सात हजारांहून अधिक कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांतर्फे देहू रस्ता येथे मानवी साखळी करण्यात आली. सरकारचा हा निर्णय चुकीचा असून, खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी तसेच ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मालमत्ता हस्तगत करण्यासाठी ही खेळी केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांतर्फे केला जात आहे.
उत्पादन घटणार
ऑर्डनन्स फॅक्टरीजला वर्षभरासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने दर महिन्याला 1.60 टक्के काम पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे 30 दिवस काम थांबल्यास फॅक्टरीजमध्ये लष्करी शस्त्रास्त्र उत्पादनावर परिणाम होणार आहे.