Stock Market Updates : भारतीय शेअर बाजारात आज, ६ मे रोजी सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेंसेक्स १५५.७७ अंकांनी म्हणजेच ०.१९ टक्क्यांनी घसरून ८०,६४१.०७ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ८१.५५ अंकांनी म्हणजेच ०.३३ टक्क्यांनी खाली येऊन २४,३७९.६० वर स्थिरावला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांमध्ये २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ६.८५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. रिअल्टी, पॉवर, युटिलिटी आणि औद्योगिक क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेची बुधवारी होणारी बैठक आणि भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढता तणाव यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. ६.८५ लाख कोटींचा फटका – बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज ४२७.४८ लाख कोटी रुपयांवरून ४२०.६३ लाख कोटी रुपयांवर घसरले. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६.८५ लाख कोटी रुपयांची घट झाली. बाजारातील ही घसरण प्रामुख्याने जागतिक अनिश्चितता आणि स्थानिक भौगोलिक तणावामुळे झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोणते समभाग चमकले? सेंसेक्समधील ३० पैकी ११ समभाग तेजीत बंद झाले. भारती एअरटेलच्या समभागाने १.६६ टक्क्यांची सर्वाधिक वाढ नोंदवली. याशिवाय टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले इंडिया यांच्या समभागांमध्ये १.०६ ते १.६२ टक्क्यांची वाढ झाली. कोणते समभाग घसरले? सेंसेक्समधील १९ समभाग घसरणीसह बंद झाले. इटर्नलचा समभाग ३.०८ टक्क्यांनी घसरून सर्वाधिक तोट्यात राहिला. टाटा मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, अदाणी पोर्ट्स आणि एनटीपीसी यांच्या समभागांमध्ये १.९५ ते २.०९ टक्क्यांची घसरण झाली. बाजाराचा मूड – बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (बीएसई) आज ४,०७२ समभागांमध्ये व्यवहार झाले. यापैकी ७८७ समभाग तेजीत, तर ३,१५१ समभाग घसरणीसह बंद झाले. १३४ समभाग सपाट राहिले. ६३ समभागांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ७८ समभागांनी नीचांक नोंदवला. बाजारातील सध्याची अस्थिरता पाहता गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.