परप्रांतीय मजुरांना राज्य सरकारचा दिलासा ; प्रवासाचा खर्च उचलण्याचा निर्णय

मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना रेल्वेच्या माध्यमातून गावी पाठवले जाणार आहे. परंतु, काही दिवसांपासून त्यांच्या प्रवास खर्चावरून संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, आता मजुरांच्या प्रवासाच्या खर्चाचा प्रश्न सुटला असून हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
आता परप्रांतिय मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी आणि इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना महाराष्ट्रात आणण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या रेल्वे प्रवासाचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार आहेत.
परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 10, 2020
सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरून ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली असून ट्वीटमध्ये सांगितले की, परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत. तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनमुळे मजुरांचा कामधंदा गेल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची भ्रांत झाली आहे. अशातच अनेक मजुरांनी पायीच आपल्या घराची वाट धरली आहे. त्यांच्याकडे प्रावस भाड्याचे पैसे नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार, ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार आहे.





