Nanded Meeting : राज्यावर दुष्काळाचं सावट; आढावा बैठकीत नेत्यांनी मारला ‘काजू-बदामांवर ताव, व्हिडिओ व्हायरल
Nanded Meeting : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

Nanded Meeting : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना नांदेडमध्ये दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतील एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मराठवाड्यातील पिकांची सद्यस्थिती, पावसाची कमतरता आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
मात्र, या बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी काजू-बदाम ठेवण्यात आल्याचं दृश्य समोर आलं आहे. या बैठकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून आणि नागरिकांकडून टीका केली जात आहे. एका बाजूला पावसाअभावी पिकांचं नुकसान होत असताना दुसऱ्या बाजूला दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामाचा पाहुणचार का करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बैठकीला अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित
या बैठकीला मंत्री, खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांचं नुकसान, पाणी आणि चारा उपलब्धता तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. सरकारकडून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन मदतीबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची गरज असल्याचं यापूर्वीच म्हटलं असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार माहिती गोळा करत असल्याचं सांगितलं आहे.
‘अधिकारी काही गोष्टी करतात आणि बदनाम आम्ही होतो’
या प्रकारावर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असं त्यांनी सांगितलं. तसेच बैठकीत काजू-बदाम देण्याच्या प्रकारावर त्यांनी प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलली.
‘अधिकारी काही गोष्टी करतात आणि बदनाम आम्ही होतो,’ अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिल्याचं वृत्त आहे. दरम्यान, मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचं नुकसान झाल्याचं अधिकाऱ्यांनीही नमूद केलं आहे.





