‘लालपरी’चा प्रवास महागणार; एसटीची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर

मुंबई – राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून आता प्रवाशांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. कारण लालपरीचा प्रवास महागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन, इंधन दरवाढ तसेच इतर सुट्ट्या भागांची दरवाढ झाल्याने तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. यावरून एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले प्रवाशांना झटका देण्याच्या तयारीत आहेत.
महामंडळाच्या प्रस्तावावर राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाडेवाढीवर शिक्कामोर्तब होणार की, प्रवाशांना दिलासा दिला जाणार, हेही लवकरच स्पष्ट होईल. मागील काही वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्याने महामंडळ भाडेवाढीसाठी आग्रही आहे. त्यामुळे राज्यातील प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे संकेत गोगावलेंनी दिले आहेत.
गोगावलेंनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. भंडारा व नाशिक येथील बसचा अपघात तसेच नुकत्याच बेस्ट चालकांकडून घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने चालक प्रशिक्षण, चालकांची निवड चाचणी, त्यांचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
महामंडळाकडील बस पडताहेत अपुऱ्या
महामंडळाकडे सुमारे 14 हजार बस आहेत. परंतु त्या प्रवाशांसाठी अपुऱ्या पडत आहेत. त्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. याचा विचार करून निविदा पात्र संस्थांनी नवीन बसचा वेळेत पुरवठा करणे आवश्यक होते. मात्र, या संस्था बस पुरविण्याबद्दल सक्षम का नाहीत? याचा पाठपुरावा करून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याच्या सूचना गोगावले यांनी महामंडळ प्रशासनाला दिल्या.
यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये भाडेवाढ
मागील तीन वर्षांपासून एसटीचे तिकीट दर स्थिर होते. तीन वर्षांपासून तिकीट दरात कोणतीही भाडेवाढ झाली नाही. यापूर्वी 27 नोव्हेंबर 2021 रोजी लालपरीची भाडेवाढ झाली होती. राज्यासह विभागातही एसटीला दिवसाला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. ही तूट भरून काढण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन सुरळीत देण्यासाठी त्यासोबतच इंधनाचा वाढता दर, सुट्ट्या भागांची वाढती किंमत भागविण्यासाठी ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.





