SSC HSC Board Exam: आता ‘एआय’ तपासणार पेपर? १० वी, १२ वी बोर्ड परीक्षेत मोठा बदल; राज्य मंडळाने नेमल्या विशेष समित्या
SSC HSC Board Exam: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत राज्य मंडळाचे मोठे पाऊल; परीक्षा आणि मूल्यमापन प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी एआयचा वापर.

SSC HSC Board Exam – शालेय शिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी राज्य मंडळाच्या दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. परीक्षा मंडळाने यासाठी तीन विशेष समित्यांची स्थापना केली आहे. या समित्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिक अचूक, पारदर्शक मूल्यमापनाला प्राधान्य देणार आहेत.
शालेय अभ्यासक्रमात इयत्तानिहाय टप्प्याटप्प्याने बदल केले जात आहेत. पहिली ते चौथीचा अभ्यासक्रम बदलला आहे. सहावीचाही अभ्यासक्रम बदलला आहे. पुढील वर्षी पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. त्यानंतरच्या वर्षी आठवी, दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांना समग्र विकासाची संधी मिळणार आहे.
सद्यस्थितीत बोर्ड परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येतो. एआय आधारित पेपर तपासणीमुळे मानवी चुकांची शक्यता कमी होईल आणि निकाल लवकर जाहीर होतील. परीक्षांचा कालावधी कमी करणे, परीक्षा वेळेत घेणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मूल्यमापन अधिक अचूक करणे याबाबत तीन विशेष समित्या अभ्यास करुन सविस्तर उपाययोजना सुचविणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ.दीपक माळी यांनी दिली.
एआयचा वापर पेपर तपासणी, प्रश्नपत्रिका तयार करण्यातही केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना सतत मूल्यमापन, प्रोजेक्ट वर्क आणि कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळेल. पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने परीक्षेची विश्वासार्हता वाढेल आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्यायही मिळणार आहे.





