लेह – लडाखमधील हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो वांगचुक यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. पत्रात गीतांजली यांनी सोनम वांगचुक यांच्या बिनशर्त सुटकेची मागणी करत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काय आहे प्रकरण? 24 सप्टेंबर रोजी लडाखमध्ये हिंसक आंदोलन भडकवल्याच्या आरोपाखाली सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) ताब्यात घेण्यात आले. सध्या ते जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानातील सहाव्या सूचीचा विस्तार यासह विविध मागण्यांसाठी सुरू झालेले आंदोलन हिंसक बनले. या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 24 जण जखमी झाले. पत्रात काय? गीतांजली आंगमो यांनी पत्रात म्हटले आहे की, 26 सप्टेंबर रोजी लेहचे पोलीस निरीक्षक रिग्जिन गुरमेत यांनी त्यांना माहिती दिली की, सोनम वांगचुक यांना NSA च्या कलम 3(2) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांना जोधपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. पत्रात त्या लिहितात, “मला आश्वासन देण्यात आले की, जोधपूरला पोहोचल्यानंतर माझे पतीशी फोनवर बोलणे होईल. मला सांगण्यात आले की, ही अटक नाही, कारण कोणतीही FIR दाखल झालेली नाही, तर ते NSA अंतर्गत ताब्यात आहेत.” मात्र, आजपर्यंत त्यांना सोनम वांगचुक यांच्याशी संपर्क साधता आलेला नाही. राष्ट्रपतींना आवाहन – गीतांजली यांनी पुढे म्हटले की, लडाख आपल्या राष्ट्रनिष्ठेने आणि भारतीय सैन्याप्रती असलेल्या निष्ठेसाठी ओळखले जाते. सोनम वांगचुक या भागात भारतीय सैन्यासाठी निवारा उभारत आहेत. त्या लिहितात, “माझे पती सोनम वांगचुक नेहमीच भारताच्या एकजुटीसाठी, सीमांचे संरक्षण आणि मजबूत लोकशाही व्यवस्थेच्या समर्थनात उभे राहिले आहेत.” लडाखच्या जनतेच्या हक्कांसाठी लढणे हा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या, “महामहिम, आपण आदिवासी पार्श्वभूमीतून येत असल्याने, लेह-लडाखच्या जनतेच्या भावना इतर कोणापेक्षा चांगल्या समजू शकता.” राष्ट्रपतींना चार प्रश्न – गीतांजली यांनी पत्रात राष्ट्रपती मुर्मू यांना चार प्रश्न विचारले आहेत: -त्यांना सोनम वांगचुक यांच्याशी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून बोलण्याचा अधिकार आहे का? -त्यांना त्यांच्या पतीच्या अटकेची कारणे आणि त्यांचे कायदेशीर अधिकार जाणून घेता येतील का? -त्यांना त्यांच्या पतीच्या सध्याच्या परिस्थितीची माहिती मिळू शकेल का? -भारताचे जबाबदार नागरिक म्हणून त्यांना शांततापूर्ण अभिव्यक्ती आणि मुक्त संचाराचा अधिकार आहे का? या पत्राद्वारे गीतांजली आंगमो यांनी सोनम वांगचुक यांच्या तात्काळ सुटकेची मागणी करत लडाखच्या जनतेच्या भावनांना न्याय देण्याचे आवाहन केले आहे.