“काही जणांमध्ये इतकी नकारात्मकता भरली आहे, की त्यांना चांगले झालेले बघवतच नाही’; पंतप्रधान मोदींची विरोधकांवर खोचक टीका

जयपुर – विरोधी पक्षांवर जोरदार टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील एका कार्यक्रमात नमूद केले की, काही जणांमध्ये इतकी नकारात्मकता भरली आहे की त्यांना काही चांगले झालेले बघवतच नाही. त्यांना केवळ वाद निर्माण करण्यात स्वारस्य असते असेही त्यांनी म्हटले आहे.
राजस्थानातील नाथद्वार भागात विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, जे केवळ मतांकडेच बघून राजकारण करतात त्यांच्यापुढे कधीच देशहित नसते.या देशात पायाभूत सुविधांवर या आधी इतके कधीच लक्ष दिले गेले नाही असा आरोपही त्यांनी केला.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हेही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनीही पंतप्रधानांकडे कटाक्ष टाकत त्यांनाही कानपिचक्या दिल्या. गेहलोत यांनी राज्यातील प्रलंबीत प्रकल्पांबद्दलही मोदींना लक्ष देण्याची विनंती केली.
डुंगरपुर रतलाम ही रेल्वे लाईन, करौली ते सरमथुरा दरम्यानची रेल्वे लाईन, असे काही रेल्वे प्रकल्प बरेच रखडले आहेत त्यांनाही त्वरीत मंजुरी मिळावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच पुर्व राजस्थानातील कॅनाल प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळावा अशी मागणीही त्यांनी केली. लोकशाहीत विरोधकांचाही सन्मान राखला गेला पाहिजे अशी सुचना त्यांनी पंतप्रधानांना केली.गेहलोत म्हणाले की सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगला समन्वय राखला गेला तरच देश अधिक वेगाने प्रगती करू शकतो.
मोदी म्हणाले की देशात या आधीच पुरेशी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली गेली असती तर देशात डॉक्टरांची कमतरता भासली नसती. नागरीकांसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था केली गेली असती तर देशात जलजीवन मिशनची गरजच भासली नसती. राजस्थानातही पुरेश दूरदृष्टीने पायाभूत सुविधांचा विकास केला गेला नाही असेही मोदींनी यावेळी नमूद केले.
देशात आता पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चांगले काम होत आहे असे नमूद करून मोदींनी आपल्या सरकारने केलेल्या कामांची उजळणीही केली. आम्ही पुढील 25 वर्षात देश संपुर्ण विकसित करण्याचे योजले आहे असेहीं मोदींनी यावेळी नमूद केले.





