Solapur News : कॅम्पमध्ये खेळायला गेला, पण खेळपट्टीवरच ‘काळ’ आला! 15 वर्षांच्या आरवसोबत नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्ह्यातील (Solapur News) बार्शी येथून एक अत्यंत धक्कादायक आणि क्रीडा जगताला सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील (Solapur News) बार्शी येथून एक अत्यंत धक्कादायक आणि क्रीडा जगताला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरामध्ये खेळपट्टी तयार करत असताना, जड रोलरखाली चिरडून आरव नावाच्या एका १५ वर्षीय निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ३० मे रोजी सकाळी ही थरारक (Solapur News) घटना घडली.
याप्रकरणी आयोजकांचा आणि प्रशिक्षकांचा निष्काळजीपणा समोर आला असून, बार्शी पोलिसांनी दोन क्रिकेट प्रशिक्षक आणि संबंधित क्रिकेट असोसिएशनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
खेळपट्टी सपाट करताना घात झाला!
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे क्रिकेट सरावाचे सत्र सुरू होण्यापूर्वी मैदानावर खेळपट्टी तयार करण्याचे काम सुरू होते. खेळपट्टी सपाट करण्यासाठी तिथे एक अतिशय जड लोखंडी रोलर आणण्यात आला होता.
प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून १५ वर्षांचा आरव इतर मुलांसोबत मिळून तो अवजड रोलर ओढत होता. मात्र, रोलर ओढत असताना अचानक आरवचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला. मुलांचा वेग आणि रोलरचे वजन जास्त असल्याने तो जड रोलर थेट आरवच्या अंगावरून गेला. यात आरव गंभीररीत्या चिरडला गेला आणि घटनास्थळीच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
प्रशिक्षकांचा बेजबाबदारपणा; सुरक्षेचे नियम धाब्यावर
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या संपूर्ण घटनेत क्रिकेट अकॅडमीचा आणि प्रशिक्षकांचा अक्षम्य निष्काळजीपणा समोर आला आहे.लहान मुलांकडून एवढे अवजड आणि जोखमीचे काम करून घेतले जात असताना घटनास्थळी एकही प्रौढ व्यक्ती, प्रशिक्षक किंवा पर्यवेक्षक उपस्थित नव्हता.
मुले कोणत्याही सुरक्षेविना, साधनांविना आणि मार्गदर्शनाशिवाय तो जड रोलर ओढत होती. इतक्या लहान मुलांकडून असं धोकादायक काम करून घेताना सुरक्षेची कोणतीही काळजी आयोजकांनी घेतली नव्हती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
दोन प्रशिक्षकांसह क्रिकेट असोसिएशनवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा
या अत्यंत गंभीर घटनेची दखल घेत बार्शी शहर पोलिसांनी (Solapur News) मोठी कारवाई केली आहे. आरवच्या मृत्यूला सर्वस्वी अकॅडमीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी दोन्ही क्रिकेट प्रशिक्षक आणि संबंधित क्रिकेट असोसिएशनविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलांना सुरक्षित वातावरण न देणे आणि त्यांच्याकडून जीवघेणे काम करून घेणे, या बाबी गुन्ह्यामध्ये प्रामुख्याने नोंदवण्यात आल्या आहेत.
पालकांमध्ये संताप: क्रीडा शिबिरांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्दैवी घटनेनंतर क्रीडा वर्तुळातून आणि पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लाखो रुपये फी घेऊन चालवल्या जाणाऱ्या अशा स्पोर्ट्स कॅम्पमध्ये मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? पालकांनी आपल्या मुलांना खेळ शिकायला पाठवायचे की अशा जीवघेण्या कामांसाठी?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी पोलीस करत असून, दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.






