Solapur Accident : नाशिकच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती! माळशिरसमधील थरकाप उडवणारा अपघात नेमका कसा घडला?
Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात आज, रविवारी (१४ जून २०२६) सकाळी एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी मोठी दुर्घटना घडली आहे.

Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली. या हृदयद्रावक दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (Solapur Accident)
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी आहेत. रांजणी गावातील भाविकांचा एक गट सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपल्यानंतर सर्वजण पिकअप वाहनातून गावाकडे परतत असताना हा भीषण अपघात झाला. (Solapur Accident)
माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत जाऊन कोसळली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहन काही क्षणांतच बुडाले. त्यामुळे वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. (Solapur Accident)
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून पिकअप वाहन बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. (Solapur Accident)
बचाव पथकांनी आतापर्यंत विहिरीतून 8 मृतदेह बाहेर काढले असून मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Solapur Accident)
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यात रस्त्यालगतच्या उघड्या विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उघड्या विहिरींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. माळशिरसमधील या दुर्घटनेमुळे तोच प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. (Solapur Accident)





