“… त्यामुळे तुम्हाला अपेक्षित असलेले उत्तर मिळू शकत नाही”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis And Raj Thackeray | मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा मुद्दा सध्या राज्यासह देशभरात चर्चेत आहे. महाराष्ट्रात विरोधकांकडून मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका न घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र त्याला न जुमानता मंगळवारी निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
यावेळी पत्रकार परिषदेत माध्यमांनी मतदार याद्यातील घोळ, दुबार मतदार, चुकीचे पत्ते यावरुन निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रश्न उपस्थित केले. त्यावर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पोस्ट करत ‘निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं’ असल्याचे म्हटलं. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीसांचे प्रत्युत्तर
“राज ठाकरे यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला. त्यांना दुसरे कुठलेही उत्तर अपेक्षित नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेले उत्तर मिळू शकत नाही,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis And Raj Thackeray |
राज ठाकरे यांची संतप्त पोस्ट
राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले की, “निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय?”, असा सवाल त्यांनी केला आहे.
“जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन,” असेही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान, कालच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनीही मतदार याद्यांवरील घोळाबाबत अनेक प्रश्न विचारले. यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी यावर स्पष्ट उत्तर देण्यास नकार दिला किंवा जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ढकलली. यामुळे परिषदेचे वातावरण तंग झाले आणि पत्रकारांनी आयोगाच्या भूमिकेवर उपरोधिक प्रश्न उपस्थित केले. Devendra Fadnavis And Raj Thackeray |
हेही वाचा:
“हातात बंदुक डोळ्यात अंगार अन्…”; वरुण धवनचा बॅार्डर 2 मधील दमदार लुक रिव्हील





