आतापर्यंत लालपरीतून १ लाखापेक्षा जास्त परप्रांतीय मजुरांचा प्रवास

मुंबई : लॉकडाऊनमुळे देशात विविध ठिकाणी जागर अडकून पडले आहेत. दरम्यान, या सर्वाना घरी पोहचवण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, राज्यात अडकलेल्या लाखो परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी पोहचवले जात आहे. मागच्या सहा दिवसांत एसटीने राज्याच्या विविध भागांतील १ लाख ६ हजार २४ परप्रांतिय मजूर, कामगारांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले आहे.
यासाठी एसटीच्या हजारो चालकांनी ७ हजार २२७ बसेसद्वारे ही सेवा दिली. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटक राज्यांच्या सीमेपर्यंत त्यांना सोडण्यात आल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
लॉकडाऊन संपेपर्यंत अशीच सेवा एसटी महामंडळाकडून दिली जाणार आहे. ही सेवा मोफत असून राज्य शासनाकडून याचे पैसे भरले जाणार आहेत.
दुसरीकडे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासाही दिला आहे. शासनाकडून एसटीला २५० कोटी रुपये इतकी रक्कम सवलतीची प्रतीपूर्ती म्हणून मिळणार असून त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या एसटीचा एका महिन्याच्या वेतनाचा तिढा सुटलेला आहे.





