Siddhivinayak Temple Donation Controversy : सिद्धिविनायक मंदिरातील ’18 कोटींच्या दानचोरी’चा वाद नेमका काय? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Siddhivinayak Temple Donation Controversy : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित 18 कोटी रुपयांच्या दानचोरीच्या आरोपांवरून राजकीय वाद रंगला आहे. राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिले. नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण, वाचा सविस्तर.

Siddhivinayak Temple Donation Controversy : अयोध्येतील राम मंदिर, आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि आता मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरी झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. चोरीची रक्कम तब्बल 18 कोटी असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे या प्रकरणाची राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याप्रकरणावर भाष्य केले आहे. दानपेटीतील सुमारे 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचे त्यांनी म्हंटले. मात्र, यानंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष तथा आमदार सदा सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
दरम्यान, या वादाचे मूळ मंदिराच्या काही विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात असल्याचे समोर आले आहे. या पत्रात मंदिरातील दानपेटीच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेमका आरोप काय?
विश्वस्तांनी पाठविलेल्या पत्रानुसार, मंदिरातील काही कर्मचारी दानपेटीतील रोख रकमेची अफरातफर करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात नऊ कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आहे. तसेच या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
दानरकमेतील वाढीमुळे संशय –
संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यापूर्वी प्रत्येक बुधवारी दानपेटीतून सुमारे 50 लाख रुपयांची रक्कम जमा होत होती. मात्र, कारवाईनंतर सलग तीन आठवडे हीच रक्कम वाढून जवळपास दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
या आकडेवारीच्या आधारे यापूर्वी दानपेटीतील काही रक्कम नियमितपणे अपहाराद्वारे बाहेर जात असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला. या संभाव्य तफावतीचा वार्षिक अंदाज घेत मंदिराला सुमारे 18 कोटी रुपयांचे नुकसान होत असावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा अधिकृत निष्कर्ष नसून संशयाच्या आधारे व्यक्त करण्यात आलेला अंदाज असल्याचेही स्पष्ट आहे.
राज ठाकरे यांनी सभेत वाचून दाखवले पत्र –
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी हे पत्र सार्वजनिकपणे वाचून दाखवत सरकारवर निशाणा साधला.
राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा संदर्भ देत त्यांनी धार्मिक संस्थांमधील आर्थिक पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. भाविकांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या मंदिरांमध्ये अशा प्रकारचे आरोप होत असतील, तर सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
विश्वस्तांचा संशय नेमका कशावर?
पत्रामध्ये कुठेही “18 कोटी रुपयांची चोरी झाली” असा ठाम दावा करण्यात आलेला नाही. दानरकमेतील अचानक झालेली वाढ आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर झालेली कारवाई या दोन बाबींच्या आधारे यापूर्वी काही रक्कम अपहाराद्वारे बाहेर जात असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत असू शकतात, अशी शक्यताही व्यक्त करून स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण –
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, विश्वस्तांच्या पत्रामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. पत्रात कुठेही 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा स्पष्ट उल्लेख नसून, मंदिर प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या सुधारणांमुळे उत्पन्नात वाढ झाल्याचा परिणाम दिसून येत आहे.
उत्पन्न वाढण्यामागील कारणे काय?
सदा सरवणकर यांनी सांगितले की, काही कंत्राटी कर्मचारी दर्शनासाठी ऑनलाइन पद्धतीने, विशेषतः GPay द्वारे, अनधिकृतरीत्या पैसे स्वीकारत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर संबंधित 19 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आणि त्यांच्याकडून शपथपत्र घेण्यात आले.
याशिवाय काही कर्मचारी रोख रकमेची हातचलाखी करून अफरातफर करत असल्याचेही समोर आले. या प्रकरणात नऊ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच काही भाविकांकडून पुजाऱ्यांना थेट दिली जाणारी रक्कम शासनाच्या नियमानुसार दानपेटीत जमा करण्याची सक्ती करण्यात आली. या उपाययोजनांनंतर मंदिराच्या अधिकृत दानरकमेतील वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्या सार्वजनिक चर्चेत “दरवर्षी 18 कोटी रुपयांची चोरी” हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर वापरला जात असला, तरी उपलब्ध माहितीनुसार हा अधिकृत तपासातून सिद्ध झालेला अपहार नाही.
विश्वस्तांनी दानरकमेतील वाढीच्या आधारे संभाव्य महसूल नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याची माहिती उपलब्ध असली, तरी 18 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे कोणत्याही अधिकृत तपास यंत्रणेने अद्याप सिद्ध केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी अधिकृत चौकशीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.





