पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर करत निर्बंधामध्ये बदल केला आहे. मात्र मंदिरांबाबत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्यावरून दुकाने आणि हॉटेल्स सुरु करण्याासाठी परवानगी मिळत असेल तर मग मंदिरांबाबत दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून उपस्थित करण्यात आला आहे.
सोमवारी राज्य सरकारकडून सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर व्यापारी व अध्यात्मिक वर्तुळात नाराजी असल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने तातडीने मंदिरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. अशी मागणी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून करण्यात आली आहे. दरम्यान सकाळी 6 ते 11 पर्यंत मंदिरं सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
शहरातील दैनंदिन करोना रुग्णवाढीचा आकडा 3 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याने शहरात वीकेंड लॉकडाऊन रद्द करावा. दुकानांची दैनंदिन वेळ रात्री 8 पर्यंत करावी, आदी मागण्यांसाठी व्यावसायिक तसेच व्यापारी आक्रमक झाले आहेत. पण, राज्यशासनाने पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरांचा समावेश पुणे जिल्ह्याचा एकच घटक म्हणून केला आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध कायम राहणार असून, नागरिकांना दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.