Shreyas Talpade: श्रेयस तळपदेचा खुलासा; शाहरुख खानमुळे मिळालं पहिलं घर
Shreyas Talpade श्रेयसने सांगितले की, त्याने घर खरेदी करण्यासाठी बँकेत होम लोनसाठी अर्ज केला होता. मात्र, त्या वेळी त्याचा अर्ज मंजूर झाला नाही.

Shreyas Talpade: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) नुकताच त्याच्या आयुष्यातील एक खास किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तिच्या कुकिंग व्लॉगसाठी श्रेयसच्या घरी पोहोचली होती. यावेळी गप्पांच्या ओघात श्रेयसने सांगितले की, मुंबईत स्वतःचे पहिले घर घेण्याचे त्याचे स्वप्न शाहरुख खान आणि फराह खान यांच्या मदतीमुळेच पूर्ण झाले.
फराह खान नेहमीप्रमाणे अनेक भेटवस्तू घेऊन श्रेयसच्या घरी गेली होती. गप्पा सुरू असताना श्रेयसने ‘ओम शांती ओम’ चित्रपटाशी संबंधित एक आठवण सांगितली. त्याने सांगितले की, या चित्रपटामुळे त्याच्या करिअरला नवी दिशा मिळालीच, पण त्याच चित्रपटामुळे त्याला स्वतःचे पहिले घरही मिळाले.
श्रेयसने सांगितले की, त्याने घर खरेदी करण्यासाठी बँकेत होम लोनसाठी अर्ज केला होता. मात्र, त्या वेळी त्याचा अर्ज मंजूर झाला नाही. बँकेतील अधिकाऱ्यांनी त्याला तो कोणत्या चित्रपटात काम करत आहे, अशी विचारणा केली. त्याने ‘ओम शांती ओम’ असे उत्तर दिल्यानंतर चित्रपटात मुख्य अभिनेता कोण आहे, असा पुढचा प्रश्न विचारण्यात आला. श्रेयसने शाहरुख खानचे नाव सांगितले. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करत आहे, असे विचारले असता त्याने फराह खानचे नाव सांगितले. (Shreyas Talpade)
बँकेतील अधिकाऱ्यांनी त्याला शाहरुख खान किंवा फराह खान यांच्याकडून अधिकृत पत्र मिळू शकते का, अशी विचारणा केली. त्यानंतर श्रेयसने तात्काळ फराह खानला फोन करून संपूर्ण परिस्थिती सांगितली. (Shreyas Talpade)

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेचा खुलासा; शाहरुख खानमुळे मिळालं पहिलं घर
श्रेयसच्या म्हणण्यानुसार, फराह खानने त्याची अडचण समजून घेतली आणि अवघ्या दोन दिवसांत शाहरुख खानकडून आवश्यक पत्र मिळवून दिले. विशेष म्हणजे, त्याच दिवशी संध्याकाळी बँकेने त्याचे होम लोन मंजूर केले. त्यामुळे मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले.
हा किस्सा ऐकल्यानंतर फराह खानलाही आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणाली की, ‘हे ऐकून मला खूप आनंद झाला. आम्ही तुला ‘ओम शांती ओम’साठी मानधन दिले होते, पण त्या चित्रपटामुळे तुला घरही मिळाले, ही खूप आनंदाची गोष्ट आहे.’
‘ओम शांती ओम’ हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. फराह खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर शाहरुख खानने दुहेरी भूमिका साकारली होती. अभिनेत्री दीपिका पदुकोणने याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते आणि त्यातील गाणी, संवाद तसेच कलाकारांच्या अभिनयाचेही मोठे कौतुक झाले होते.
दरम्यान, श्रेयस तळपदेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो सध्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात झळकणार आहे. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, सुनील शेट्टी, परेश रावल यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
श्रेयसने सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, शाहरुख खान आणि फराह खान यांनी वेळेवर केलेल्या मदतीचे अनेक जण कौतुक करत आहेत.





