शिर्डी : काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांवर अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत साईबाबा संस्थानाने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. काय घेतला निर्णय? साई संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय संस्थानाने घेतला आहे. संस्थानातील कर्मचाऱ्यांची पहाटे चार वाजता ड्युटी सुरू व्हायची, ती आता सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानाकडून हे मोठे पाऊल पाऊल उचलण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच सुरू करण्यात येईल, अशी माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. तसेच हत्याकांडातील पीडितांच्या नातेवाईकांना संस्थानाकडून मदत देखील दिली जाणार आहे. विमा पॉलिसीसह अन्य मदतही संस्थान मिळवून देणार असल्याचे संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. कसे असेल संस्थानाच्या कर्मचाऱ्यांचे नवे वेळापत्रक पहिली शिफ्ट – सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट – दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत तिसरी शिफ्ट – रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जनरल शिफ्ट – सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली लुटीच्या उद्देशाने मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी शिर्डी संस्थानातील दोन कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी आणखी एका वयोवृद्धावर असाच हल्ला केल्याने ते देखील गंभीर जखमी आहेत. सुभाष घोडे व नितीन शेजूळ अशी मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सुभाष घोडे आणि नितीन पहाटे हे दोघे साई संस्थानामध्ये कामावर जात असतानाच लुटीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी किरण सदाफुले याला संशयावरून ताब्यात घेतले आहे.