Shivshahi Bus : स्वारगेट अत्याचार ते आरामदायी सुविधा…; प्रवाशांच्या मदतीला सदैव धावणाऱ्या ‘शिवशाही’वर का होते सतत टीका? आजपर्यंत किती अपघात झाले?

Shivshahi Bus : एसटी बस अर्थात लालपरी ही आपल्या सर्वांची जीवनवाहिनी. शहरातील गुळगुळीत रस्त्यांपासून ते वाड्या वस्त्यांवरील धुराळ्यातून वाट काढत येणारी एसटी सर्वांना हक्काची वाटते. एसटीने कात टाकावी, अशा चर्चा वारंवार होतच असतात. ‘शिवशाही’ या वातानुकूलित एसटी गाड्यांकडे ‘एसटी’चा चेहरामोहरा बदलण्याचा एक प्रयत्न म्हणूनच पाहिलं जातं. असं असलं तरी शिवशाही एसटी गाड्यांची चर्चा ही अनेकदा नको त्या कारणांसाठीच अधिक होते, असा आजवरचा अनुभव आहे.
नुकताच पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही एसटी बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि शिवशाही बस पुन्हा एकदा चर्चेत आली. 2017 साली शिवशाही एसटी बस पहिल्यांदा एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या. त्यावेळी परिवहन मंत्री होते ‘दिवाकर रावते’.
पांढरा रंग त्यावर भगव्या अक्षरात ‘शिवशाही’ हे नाव, संपूर्ण काचबंद वातानुकूलित असलेल्या या गाड्या. काचेला पडदे, प्रवाशांना मोबाईल चार्जिंगची सुविधा, डोक्यावर एसी व्हेन्ट, मागे रेलता येणारी आसने अशा अत्याधुनिक सुविधा शिवशाहीमध्ये देण्यात आल्या. दोन शहरांदरम्यान वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी शिवशाही गाड्या रस्त्यावर उतरवण्यात आल्या.
मात्र अपघात, आगीच्या घटना, स्वच्छतेचा अभाव, वातानुकूलित यंत्रणेतील बिघाड यांमुळेच ही बस अधिक चर्चेत राहिली. अशातच आता स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या बंद शिवशाहीमध्ये अत्याचाराची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली आणि शिवशाही बस पुन्हा चर्चेत आली.
बुधवारी (दि. 26) सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. गावी निघालेल्या 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून, आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिरूर तालुक्यातील गुणाव गावातील एका शेतातील विहिरीजवळून त्याला अटक करण्यात आली.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण चांगलेच पेटले असून, सर्वच राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या इतर शिवशाही बसचे देखील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून असे दिसून येत की, प्रवाशांच्या उत्तम सेवेसाठी सुरु केलेल्या या बसचा भलत्याच कारणासाठी वापर होत आहे.
पहिली ‘शिवशाही’ कधी सुरु झाली, सध्या किती बस रस्त्यावर धावतात….
पहिली शिवशाही बस 10 जून 2017 रोजी मुंबई-राजगिरी मार्गावर धावली होती. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही सेवा सुरू करण्यात आली. सध्या 792 शिवशाही बस ताफ्यात असून, त्यातील 500 बस सुरू आहेत, तर 292 बस कार्यशाळेत आहेत. मुंबई-पुणे, नागपूर-औरंगाबाद आणि इतर मार्गांवर या बस महत्वाची सेवा देतात.
खुलासा..
एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही(वातानुकूलित )बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही.(जनसंपर्क अधिकारी) pic.twitter.com/CyrIINKV0Q
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) December 2, 2024
महिलांना निम्म्या तिकीटाची सुविधा मिळू लागल्याने शिवशाही बस जोरात धाऊ लागल्या. मात्र, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सेवा बंद होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर MSRTC कडून “शिवशाही बस सेवा बंद करण्याचा कोणताही विचार नाही” असे स्पष्टीकरण दिले. दि. 2 डिसेंबर 2024 ला ट्विट करत ही माहिती देण्यात आली.
शिवशाही बसेसची प्रमुख वैशिष्ट्ये :
– शिवशाही बसेसमध्ये अत्याधुनिक व्होल्वो मॉडेल्स बसवण्यात येतात, जे त्यांच्या उत्कृष्ट आराम आणि सुरक्षिततेच्या मानकांसाठी ओळखले जातात.
– शिवशाही बसेसचा एक उल्लेखनीय फायदा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मार्गांवर आणि जिल्ह्यांमध्ये त्यांचे विस्तृत कव्हरेज. तुम्ही मुंबई ते पुणे किंवा नागपूर ते औरंगाबाद प्रवास करत असलात तरी, तुम्हाला तुमच्या मार्गावर सेवा देणारी शिवशाही बस सापडण्याची शक्यता आहे.
– शिवशाही बसेसमधील बस व्यवस्था प्रवाशांना जास्तीत जास्त आराम देण्यासाठी आणि लांब प्रवास अधिक आनंददायी बनवण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक डिझाइन केलेली आहे.
– यामध्ये प्रवाशांना बाहेरील आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून साउंड प्रूफ खिडक्या (काच) बसवल्या आहेत. मोबाईल चार्जिंगची सुविधा, डोक्यावर एसी व्हेन्ट, मागे रेलता येणारी आसने अशा आधुनिक सुरविधा देण्यात आल्या आहे.
शिवशाही बसचा सर्वात मोठा अपघात :
दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ शिवशाही बसचा अपघात झाला होता. सकाळी भंडारा आगारातून बस गोंदियाला जात असताना शिवशाही बस अनियंत्रीत झाली व रोडाच्या बाजूला उलटल्याने अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 34 जण गंभीर जखमी झाले होते.
यावेळी शिंदे सरकारने मृतांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तर, पीएमएनआरएफकडून 2 लाखांची मदत जाहीर केली. दरम्यान, गेल्या दिवसांपासून शिवशाही बस अपघातांच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच स्वारगेट प्रकरणानंतर पुन्हा एकदा ही बस चर्चेत आली आहे.
आजपर्यंत किती अपघात झाले?
शिवशाही बस अपघातांच्या संदर्भात उपलब्ध आकडेवारीनुसार, 2018 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) शिवशाही बसच्या 131 अपघातांमध्ये किमान 5 जणांचा मृत्यू झाला आणि 126 जण जखमी झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तर, नोव्हेंबर 2024 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील झालेल्या शिवशाही बस अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 34 जण जखमी झाले आहेत. सध्या, शिवशाही बस अपघातांच्या एकूण आकडेवारीबद्दल अधिकृत आणि अद्ययावत माहिती उपलब्ध नाही.
महामंडळाच्या ताफ्यात किती बस आहेत?
महामंडळाच्या ताफ्यात निमआराम, स्लिपर कोच, शिवशाही, ईलेक्ट्रिकसह सर्वप्रकारच्या सुमारे 15 हजार 600 च्या जवळपास बसेस आहेत. त्यात 892 शिवशाही बसेसचा समावेश आहे.





