राज्यात पुन्हा ‘शिवशक्ती-भीमशक्ती’? प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंसोबत ‘त्या’ भेटीचा खुलासा करत स्पष्टच सांगितलं…

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ‘शिवशक्ती-भीमशक्ती’चा प्रयोग पाहायला मिळणार का याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. अकोल्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युतीबाबत भाष्य करतानाच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एकदा बोलावलं होतं असा खुलासाही केला आहे.
“शिवेसेनसोबत आमची युती होऊ शकते. आता करायची की नाही हे शिवसेनेने ठरवावं,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. हा शिवसेनेसाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव समजावा का? असं विचारलं असता त्यांनी, “मी तुम्हाला आणखी थोडी माहिती देतो. उद्धव ठाकरे यांनी मला एकदा बोलावलं होतं, पण त्यांची यावर बोलण्याची हिंमत झाली नाही” असा खुलासा केला.
बाळासाहेबांशीही माझे चांगले संबंध
“उद्धव ठाकरेंशी माझी चांगली ओळख आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो, बाळासाहेबांशीही माझे चांगले संबंध होते. पण आता लग्न करायचं की नाही हे त्यांनी ठरवावं. त्यांना फक्त मैत्रीच हवी आहे, त्याच्या पुढे जाण्यास तयार नाही.” अशी कोपरखळी प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला मारली.
काँग्रेससोबत युती?
प्रकाश आंबेडकर यांना यावेळी काँग्रेससोबतच्या युतीबाबत विचारला असता त्यांनी, ‘याअगोदरही प्रस्वात देण्यात आले आहेत. आम्ही शिवसेनेची, काँग्रेसची दोघांची वाट पाहतोय’ असे सांगितले.





