Shirur Politics : ‘बेट’ भागात राजकारण तापले! राष्ट्रवादीचे गट-तट अन् अपक्षांच्या गर्दीत मतदार कोणाला कौल देणार? जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
टाकळी हाजी ( प्रवीण गायकवाड ) – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बेट भागातील वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक उमेदवार रिंगणात असणार आहेत. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे दोन्ही गटाचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरणार आहेत. टाकळी हाजी गटात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण असून यावेळी पंचायत समिती गणात कोण महिला उमेदवार असणार यावर देखील जिल्हा परिषदेचे मतांतर अवलंबून आहे. सद्ध्या सत्ताधारी गटाचे राजेंद्र गावडे हे इच्छुक उमेदवार म्हणून तयारीला लागले आहेत.
कार्यकर्ता मेळावे, मतदारांच्या भेटी, सहली, तसेच विविध विकासकामे करणार असल्याचे आश्वासन या वेळी मतदारांना दिले जात आहे. दुसरे इच्छुक उमेदवार म्हणून बेट भागात दांडगा जनसंपर्क असलेले दामुशेठ घोडे यांनी देखील जनतेसाठी दिलेला वेळ व त्यांच्या कामाची पद्धत लोकांमध्ये स्नेहभाव वाढवत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच अजूनही कवठे येमाई येथील माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, घोडगंगा कारखान्याच्या माजी संचालक सावित्रा थोरात, बाळासाहेब डांगे हे अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे चर्चेत आहे.
परंतु, निवडणूक लढवणारे उमेदवार किती यशस्वी होणार? लोकांची भावना, विकासाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, सोडवण्यासाठी कोण प्रयत्न करणार? विविध प्रकारचे प्रश्न कोण सोडवणार? यावरून चित्र स्पष्ट होणार आहे. जो उमेदवार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार, त्याच्यासाठी मतदार आपली भूमिका पार पाडतील. सद्ध्या विविध क्षेत्रातील अनेक प्रश्न अडचणी नागरिकांच्या समस्या निर्माण होत आहेत.
समाजातील गरीब निराधार जनता तसेच महिला वृद्ध नागरिक यांच्यासाठी काय विकासयोजना आहेत याविषयी हा गट देखील निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे.आपले भवितव्य, अस्तित्व जपण्यासाठी सर्व उमेदवार प्रयत्नशील राहतील, हे निश्चित आहे. पण मतदारांची भूमिका काय असेल? ते कोणाच्या बाजूने उभे राहणार? हे मात्र निवडणुकीच्या वेळीच स्पष्ट होईल.
शेतकऱ्यांचे प्रश्न..
मालाला बाजारभाव नाही, कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत. मागील काळात पूरामुळे झालेले नुकसान, बिजबिल समस्या या शेतकऱ्यांच्या व्यथा आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी कोणाच्या बाजूने कौल देतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तरुणांचा कौल कोणाला?
निवडणुकीमध्ये तरुण मतदार संख्येने अधिक आहेत. पुढील काळात त्यांच्यासाठी असलेले नियोजन, बेरोजगार तरुणांसाठी केलेले प्रयत्न, हे देखील तितकेच महत्वाचे आहे. नोकरदार वर्गासाठी शासनाने केलेल्या विविध योजना राबविलेले कार्यक्रम, शैक्षणिक सामाजिक प्रशासकीय बाबी व अडचणी याचे निराकरण करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील यावर मतांतर अवलंबून राहणार आहे.
गटातील हितसंबंध..
उमेदवार ज्या गटातील हितसंबंध नातेसंबंध यावर देखील काही प्रमाणात उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता असते. लोकांशी संपर्क, बांधलेली नाळ, यावर मतांचे राजकारण केले जाते.सध्याच्या काळात मतदार हा सुज्ञ आहे. उमेदवार पाहून विकासाच्या बाबी उमेदवाराचे कार्य, पुढील काळात दिसून येणारी परिस्थिती, विकास, चांगले-वाईट परिणाम याचा विचार करून मतदार निर्णय घेणार आहे. निवडणूक लढवणारे उमेदवार देखील किती मतदारांचा विश्वास संपादन करत आपली भूमिका स्पष्ट करतात. ही उमेदवारांची भूमिका लोकांच्या गळी किती उतररेल? यावर त्यांचे भविष्य अवलंबून आहे.




