Shirur News : शिरूरमध्ये कामगार कल्याण योजनेच्या नावाखाली दलालांचा पैशाचा खेळ; नागरिकांकडून कारवाईची मागणी

शिरूर : शिरूर शहर आणि तालुक्यात कामगार विभागाच्या कल्याणकारी योजनांच्या नावाखाली दलालांनी खुलेआम पैशाची उकळणी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरूर शहरातील अबिंका माता मंदिर, सिद्धार्थनगर, गुलमोहोर बिल्डिंग, मुंबई बाजार, शाळा क्र. ५, शिवसेवा वखार (मिल) शेजारी, जुने मार्केट यार्डच्या मागील बाजूस वडाच्या झाडासमोर तसेच तालुक्यातील काही ग्रामीण भागात हे प्रकार घडत असल्याचे उघड झाले आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिरूरमधील सजग नागरिकांनी केली आहे.
रत्नागिरीतील पावस आणि गोळप येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त करत पोलिसांना त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. आता शिरूर पोलीस या दलालांवर तपास करून कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पालकमंत्री सामंत म्हणाले, “कामगार विभागाची कल्याणकारी चळवळ दोन वर्षांपूर्वी ९,००० नोंदणींनी सुरू झाली, ती आता ५६,००० पर्यंत पोहोचली आहे. सरकारचा उद्देश कुटुंबांना मोफत अत्यावश्यक वस्तू, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य देणे आहे. पण काही दलालांनी फॉर्म भरायला ५०० रुपये आणि साहित्य मिळवण्यासाठी १,५०० रुपये अशी लूट सुरू केली आहे. हे तातडीने थांबवणे गरजेचे आहे.”
शिरूर तालुक्यातही असेच प्रकार बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी कामगार लाभार्थ्यांकडून फॉर्म भरवण्याच्या नावाखाली आणि साहित्य वाटपासाठी रोख रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांची फसवणूक होत असून सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कामगार विभागाकडून देण्यात येणाऱ्या संचाची किंमत सुमारे १०,००० रुपये असून, हे साहित्य शासनाकडून मोफत दिले जाते. मात्र, दलालांनी यावर नफे खोरीचा धंदा सुरू केला आहे. नागरिकांनी मागणी केली आहे की, शासनाने विशेष तपास यंत्रणा स्थापन करून जिल्हाभरात मोफत साहित्य वाटप प्रक्रियेवर लक्ष ठेवावे आणि दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी.





