Shirur News : शिरूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोला तिसऱ्यांदा लागली आग

शिरूर : शिरूर शहरात कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नगरपरिषदेचा कचरा डेपो तिसऱ्यांदा जळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड धूर आणि दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
MPCB आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या संदर्भात मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड आणि मनसेचे शहर सचिव रवी लेंडे यांनी वेळोवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) पुणे यांना निवेदने दिली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट, शिरूर नगरपरिषद प्रशासन MPCB ला दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोप केला जात आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
या आगीमुळे शहरात प्रदूषणाचा स्तर प्रंचड वाढला असून, धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेच्या समस्या जाणवत आहेत. वारंवार होणाऱ्या या घटनांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आंदोलनाचा व आमरण उपोषणाचा इशारा..
या गंभीर परिस्थितीबाबत प्रशासन आणि MPCB यांनी तातडीने उपाययोजना न केल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने कचरा व्यवस्थापनासंबंधी योग्य त्या उपाययोजना न केल्यास, हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नगरपरिषद आणि MPCB जबाबदारी घेणार का? या घटनेमुळे शिरूर नगरपरिषद आणि MPCB यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात आहे, परंतु प्रत्यक्ष कृती शून्य आहे. आता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन ठोस पावले उचलते की पुन्हा निष्क्रियतेचे धोरण ठेवते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.





