Ranjangaon News : दामदुप्पट परताव्याचे आमिष; कारेश्वर भिशीच्या नावाखाली 39 जणांना 20 कोटींचा गंडा
दामदुप्पट परताव्याचे आमिष, मोठ्या आर्थिक उलाढालीचा बनाव आणि विश्वास संपादन करून गुंतवणूकदारांकडून (Ranjangaon News) कोट्यवधी रुपये जमा करण्याचा धक्कादायक प्रकार कारेगाव (ता. शिरूर) येथे उघडकीस आला आहे.

Ranjangaon News : दामदुप्पट परताव्याचे आमिष, मोठ्या आर्थिक उलाढालीचा बनाव आणि विश्वास संपादन करून गुंतवणूकदारांकडून (Ranjangaon News) कोट्यवधी रुपये जमा करण्याचा धक्कादायक प्रकार कारेगाव (ता. शिरूर) येथे उघडकीस आला आहे.
‘कारेश्वर बी.सी. मंडळ’च्या नावाखाली कथितपणे चालविण्यात आलेल्या भिशीमध्ये तब्बल ३९ गुंतवणूकदारांकडून २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. भिशी बंद पडल्यानंतर पैसे परत मागूनही रक्कम मिळाली नसल्याने या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुलभा शरद नवले, नितीन शरद नवले, सुहास शरद नवले, अश्विनी नितीन नवले आणि प्रतिक्षा सुहास नवले (सर्व रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी बारकू चंदर सोनवणे (वय ५४, व्यवसाय शिक्षक, रा. चंदननगर, पुणे; मूळ रा. वाघाळे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
फिर्यादीनुसार, सुलभा नवले यांनी ‘कारेश्वर बी.सी. मंडळ’ ही नोंदणीकृत भिशी (Ranjangaon News) असल्याचे भासवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. लिलाव भिशीत पैसे गुंतविल्यास अवघ्या एका वर्षात मूळ रकमेच्या दामदुप्पट रक्कम मिळेल, असे सांगितल्याचा आरोप आहे.
भिशी चालविण्याचा तब्बल १७ वर्षांचा अनुभव असून दरमहा सुमारे १९ भिशी आणि तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी बारकू सोनवणे यांनी स्वतःसह कुटुंबीयांच्या माध्यमातून विविध भिशींमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. त्यापैकी कारेश्वर भिशीत ७५ लाख ४० हजार रुपये गुंतविल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामध्ये ४२ लाख ६० हजार रुपये ऑनलाइन, तर ३२ लाख ८० हजार रुपये रोख दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, भिशीत पैसे भरण्यासाठी सांगण्यात आलेल्या इतर व्यक्तींच्या बँक खात्यांवरही रक्कम वळती करण्यात आल्याचा आरोप आहे. सोनवणे यांच्या पत्नीच्या खात्यातून विविध तारखांना मोनेष युवराज धुमाळ, मनोहर काका वारे, दीपक सुभाष नवले आणि नितीन शरद नवले यांच्या खात्यांवर एकूण २४ लाख रुपये पाठविण्यात आल्याचे नमूद आहे.
तसेच मुलगी अपूर्वा बारकू सोनवणे हिच्या खात्यातून कुलदीप तात्या बांदल यांच्या खात्यावर पाच लाख रुपये वळते करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुलभा नवले आणि नितीन नवले यांच्याकडे १० लाख रुपये रोख दिल्याचाही दावा फिर्यादीने केला आहे.
रोख रक्कम स्वीकारताना घरातील नोटा मोजण्याच्या मशीनद्वारे पैसे मोजले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार नेमके कशा पद्धतीने झाले, याचा तपास पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या कथित व्यवहारात दीपक नवले याचाही सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भिशीतील सभासदांची नावे, जमा होणारी रक्कम आणि भिशी उचलणाऱ्या सभासदांची माहिती स्पायरल बाइंडिंगमध्ये लिहिण्याचे काम तो करीत असल्याचा आरोप आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे ‘कारेश्वर बी.सी. मंडळ’ कोणत्याही सरकारी कार्यालयात, बँकेत किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत नसतानाही ते नोंदणीकृत असल्याचे भासविण्यात आले, असा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
सन २०२० ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३९ गुंतवणूकदारांकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात तब्बल २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये जमा केल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे.
भिशी बंद पडली अन् गुंतवणूकदारांची धावपळ
नोव्हेंबर २०२४ पासून भिशी बंद पडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी (Ranjangaon News) आपापली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मात्र वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळाले नसल्याचा आरोप आहे.
दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला आणि कोट्यवधी रुपये जमा केल्यानंतर रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
३९ गुंतवणूकदारांचा पैसा नेमका कुठे गेला?
३९ गुंतवणूकदार, २० कोटींहून अधिक रकमेची कथित उलाढाल आणि पाच जणांविरुद्ध गुन्हा (Ranjangaon News) यामुळे या प्रकरणाचा तपास आता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जमा झालेली रक्कम कोणत्या खात्यांमध्ये जमा झाली, कोणाच्या खात्यावर किती रक्कम वळती करण्यात आली, रोख व्यवहार किती झाले, भिशीतील प्रत्यक्ष लाभार्थी कोण होते आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे बँक स्टेटमेंट, ऑनलाइन व्यवहार, रोख रकमेचे व्यवहार तसेच भिशीच्या कथित हिशोबाच्या नोंदी तपासल्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराचे खरे स्वरूप आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे ३९ गुंतवणूकदारांसह संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.






